ठाणे

Barvi Dam overflow : ठाणे जिल्हावासियांसाठी आनंद वार्ता! अखेर बारवी धरण ओव्हरफ्लो

धरण १०० टक्के भरल्याने ठाणे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे सावट आता वर्षभरासाठी मिटले आहे

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पावसाने चांगलाच जोर धरल्याने ठाणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी आली आहे. जिल्हावासियांची तहान भागवणारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण अखेर तुडुंब भरले असून त्याच्या सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या पातळीत झपाट्याने होणारी वाढ पाहता धरण भरण्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली होती. ही प्रतीक्षा आता पूर्ण झाली असून धरण १०० टक्के भरल्याने ठाणे जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे सावट आता वर्षभरासाठी मिटले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची चिंता आता मिटली आहे.

सोमवार १० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार बारवी धरणाची पातळी ७२.६१ मीटरवर गेली आहे. धरणाची धोक्याची पातळी ७२.६० मीटर आहे. म्हणजेच धरण ०.०१ मीटरने ओव्हरफ्लो होत आहे. धरणात ३३९.०२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला असून ते तब्बल १००.०५ टक्के भरले आहे. गेल्या २४ तासांत पाणलोट क्षेत्रात ४.८० मिमी पाऊस झाला. या पावसाळ्यात आतापर्यंत एकूण २२५०.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण भरल्याने कोणताही धोका होऊ नये म्हणून प्रशासनाने २.५ क्यूसेक वेगाने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले असून धरणातून बारवी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

गेल्या वर्षी याच दिवशी धरणाची स्थिती थोडी कमी होती. १० ऑगस्ट २०२५ रोजी पातळी ७२.२८ मीटर, पाणीसाठा ३२७.४५ दशलक्ष घनमीटर आणि टक्केवारी ९६.६४ टक्के होती. तसेच एकूण पाऊस १९९३.० मिमी इतका झाला होता. यंदा पाऊसही जास्त आणि पाण्याचा साठाही जास्त असल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. बारवी भरल्यामुळे आता कल्याण डोंबिवली, ठाणे आणि आसपासच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढील एक वर्षासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. मात्र धरण आणि नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही जाऊ नये आणि लहान मुलांनी पाण्याजवळ खेळू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

रहिवाशांसह उद्योगांना मोठा दिलासा

बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि मीरा-भाईंदर यांसारख्या प्रमुख शहरांसह एमआयडीसीच्या सर्व औद्योगिक वसाहतींचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसांत भेडसावणारी पाणी कपातीची टांगती तलवार आता दूर झाली आहे. सद्यस्थितीत धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बारवी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. एकीकडे निसर्गाची भरभरून झालेली कृपा आणि धरणाचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी आता पर्यटकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर दुसरीकडे नदीकाठच्या गावांना आणि प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कुणीही नदीच्या पात्रात प्रवेश करू नये, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT