

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्हावासियांची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाने मुसळधार पावसामुळे आज पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे. रविवारी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार बारवी धरण ९९.८८ टक्के भरले असून धरणातील पाणी पातळी आणि ओव्हरफ्लो पातळीमध्ये केवळ ०.०१ मीटर इतकेच अंतर शिल्लक राहिले आहे.
एमआयडीसी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारवी धरणाची सध्याची पाणी पातळी ७२.५९ मीटर इतकी झाली आहे. धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठा ३३८.४४ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे.
बारवी धरणाची ओव्हरफ्लो पातळी ७२.६० मीटर आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत धरण ओव्हरफ्लो होऊन पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.