ठाणे : प्रवीण सोनावणे
कार्यकर्त्यांची इच्छा नसताना महायुतीमध्ये निवडणूक लढवून सत्तेत एकत्र आलेल्या शिवसेना आणि भाजप मधील संघर्ष भविष्यात वाढणार असल्याची चाहूल पहिल्याच महासभेत अनुभवायला मिळाली आहे. महापालिकेतील संख्याबळाच्या जोरावर गेले अनेक वर्ष सत्ताधारी शिवसेनेने आपला एक कलमी कारभार सुरु ठेवला असला आहे. मात्र पालिका निवडणुकीपूर्वीच आक्रमक भूमिकेत असलेली भाजप आता सत्तेत सहभागी असूनही महापालिकेत चौकीदारच्या भूमिकेत असल्याने भविष्यात दोन्ही पक्षातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे नाकारता येणार नाहीत.
ठाणे महापालिकेत गेल्या 25 ते 30 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीचा इतिहास पाहता शिवसेना आणि भाजप स्वतंत्र निवडणूक लढवून त्यानंतर सत्तेत एकत्र येत होते. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी पूर्वीच महायुतीमध्ये निवडणूक लढण्यावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मतभेद पाहायला मिळाले. भाजपचे ठाण्यातील वरिष्ठ नेते देखील महायुतीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते. मात्र कार्यकर्त्यांची मते डावलून ठाणे महापालिकेची निवडणूक महायुतीमध्ये लढवण्यात आली. यामध्ये शिवसेनेला महायुतीचा फायदा होऊन त्यांना महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले तर भाजपला महायुतीमध्ये फारसा करिष्मा दाखवता आला नाही.
हीच निवडणूक जर स्वतंत्रपणे लढले असते तर भाजपला याचा निश्चित फायदा झाला असता असा दावा आजही ठाण्यातील भाजपचे नेते करत आहेत. निवडणुकीनंतर सन्मानजनक पदे मिळाली नाही तर विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेणारी भाजप आता सत्तेत सहभागी झाली असली तरी,पहिल्याच महासभेत दोन्ही पक्षात संघर्षांची ठिणगी पडल्याने सत्तेत एकत्र असूनही दोन्ही पक्षातील संघर्ष हा अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.
दोन्ही पक्षात भविष्यात संघर्ष वाढण्याची कारणे देखील तितकीच महत्वाची आहेत. पालिकेच्या पहिल्याच महासभेत गेल्या तीन वर्षाच्या कारभाराचा हिशोब मागितल्यानंतर याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. दुसरीकडे भाजप सोबतच अनेकांच्या लक्षवेधी न घेता गोंधळामध्येच विषयांना मंजुरी देण्याची परंपरा पहिल्याच महासभेत सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाने कायम ठेवली.
वादग्रस्त विषयांवर चर्चा न होणे, गोंधळात महत्वाच्या विषयांना मंजुरी देणे, असे प्रसंग अनेकवेळा महासभेत घडले आहेत. मात्र या टर्मच्या पहिल्याच महासभेत स्वतः उपमहापौर आणि भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील हे त्यांचे आसन सोडून थेट शिवसेनेच्या या भूमिकेचा विरोध करण्यासाठी खाली उतरले हे महासभेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले असून यावरूनच भविष्यातील शिवसेनेचा आणि भाजपचा संघर्ष हा किती तीव्र असून शकतो याची प्रचिती या पहिल्याच महासभेत आली आहे. यापुढे असा कारभार या महापालिकेत चालू देणार नाही असा स्पष्ट इशाराच उपमहापौर कृष्णा पाटील तसेच भाजपच्या नगरसेवकांनी दिला असल्याने चौकीदाराच्या भुमीकेत असलेल्या भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे भविष्यात हा संघर्ष अधिक वाढणार एवढे मात्र निश्चित आहे.