ठाणे : वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या असलेल्या ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी घोडबंदर मार्गावरील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांच्या वतीने घेण्यात आला आहे. हा बदल आजपासून (दि. ६ जून) ते ८ ऑगस्टपर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे अंतर्गत भागातून घोडबंदरकडे येणाऱ्या वाहनांना या वाहतूक बदलांचा त्रास होण्याची शक्यता आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेल्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाण्याच्या प्रवासाचा वेळ बराच कमी होणार आहे. ठाणे ते बोरिवली या ११.८४ किलोमीटर लांब रस्त्याच्या प्रवासासाठी सद्यास्थितीत ६० ते ९० मिनिटेलागतात, मात्र नव्या दुहेरी बोगद्यामुळे हा वेळ अत्यंत कमी होऊन केवळ १५ मिनिटांमध्ये हा प्रवास शक्य होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच बोगद्याच्या खोदकामासाठी नायक नावाच्या मशीनचा शुभारंभ करण्यात आला आहे. हे मशीन देशातील एकमेव सिंगल शिल्ड हार्ड रॉक टीबीएम (टनल बोरिंग मशीन) आहे. या मशीनच्या मदतीने खोदकाम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आता या कामाला आणखी गती देण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे.
ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जाणार आहे. वनक्षेत्रावर कमीत कमी पर्यावरणीय परिणाम होईल अशा प्रकारे या बोगद्याचे बांधकाम केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी अॅडवान्स टनल बोरिंग मशीन लावण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले असल्याची माहिती एमएमआरडीएच्या सूत्रांनी दिली आहे.
सद्यास्थितीत ठाण्याहून बोरिवलीला जाणाऱ्या प्रवाशांना घोडबंदर रोडवरून जावं लागतं. मात्र या रस्त्यावर नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या प्रवासासाठी एक ते दीड तास लागतो. ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून जाणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील हा प्रकल्प एक भाग आहे. एकूण ११.८४ किमी लांबीच्या मार्गापैकी १०.२५ किमीचा भाग दुहेरी बोगद्याचा असेल.
असे आहे वाहतुकीत बदल
मुलाबाग येथील हीलख्रिस्ट गृहसंकुलाच्या इथून नीलकंठ ग्रीनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना सत्य शंकर गृहसंकुलासमोर प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना विरुद्ध दिशेने प्रवास करता येणार आहे.
असा आहे ठाणे-बोरिवली बोगदा
दोन्ही दुहेरी बोगद्यात एकूण तीन लेन असतील. ज्यामध्ये एक आपत्कालीन लेनचा देखील समावेश असेल. याशिवाय बोगद्यातून बाहेर पडणं सोपं जावं यासाठी प्रत्येक ३०० मीटरच्या अंतरावर क्रॉस-पॅसेज तयार करण्यात येणार आहे.
सोबतच सुरक्षेसाठी बोगद्याच्या आत
आग विझविण्याची उपकरणं, स्मोक डिटेक्टर आणि एलईडी आधारित सूचना डिस्प्ले लावण्यात येणार आहे. या बोगद्याच्या माध्यमातून ठाण्याच्या घोडबंदर रोडला पश्चिम द्रुतगती मार्गाशी जोडले जाणार आहे.