ठाणे : टीएमटी बस स्टॉप, विहीर, शौचालये गायब झाल्याचे प्रकार ठाण्यात घडले होते. आता मूर्तीसह मंदिर आणि विहीर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कारण ढोकाळी येथील हायलँड पार्क रोड येथे असलेले ५० वर्षे जुने कुलदैवताचे मंदिर मूर्तींसह गायब झाल्याची तक्रार पोलिस नोंदवून घेत नसल्याचे साकडे ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे घातल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे.
दरम्यान याबाबत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी या लक्ष घालण्याची सूचना आमदार केळकर यांनी दिल्याने खरा प्रकार उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपचे खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ढोकाळी येथील ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेत निवेदन दिले. नवरात्रीनिमित्त २० सप्टेंबर रोजी मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना देवांच्या मूर्ती, चांदीचे सामान आणि मंदिरही गायब झाल्याचे आढळून आले. तर जवळील विहिरही बुजवण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांना याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली नसल्याची माहिती ग्रामस्थांनी केळकर यांच्याकडे केली.
आमदार संजय केळकर यांचा 'जनसेवकाचा जनसंवाद' हा कार्यक्रम ठाणे शहर पुर्ता मर्यादित न रहाता मुंबईपासून बदलापूर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातूनही नागरिक आपल्या तक्रारी घेऊन आ. केळकर यांना भेटत आहेत. त्यात विकासकाने घरांसाठी केलेली फसवणूक, शैक्षणिक विभाग, ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक, नोकरी अशा अनेक विषयांसंदर्भात निवेदने प्राप्त झाली.
यावेळी जनसंवाद कार्यक्रमास माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, युवा मोर्चाचे सुरज दळवी, जितेंद्र मढवी, मेघनाथ घरत, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक द्वारका डोखे यांनी २२ मे २०२४ रोजी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवले. प्राणवायूची कमतरता असलेल्या या शिखरावर जन गण मन हे राष्ट्रगीत गाणारी राज्य आणि देशातील पहिली महिला गिर्यारोहक असल्याचे बोलले जाते. या कामगिरीचे कौतुक अप्पर पोलिस महासंचालक राजेश कुमार यांनी महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीचे सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. आमदार संजय केळकर यांनीही त्यांचे कौतुक करत जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात सत्कार केला.