ठाणे : शहरातील भटके कुत्रे अचानक गायब होऊ लागले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे कुत्रे नेमके जातात कुठे याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही मात्र शहरातील सोसायटीमध्ये काही तरुण केबलच्या वायरीचा फास तयार करून कुत्रे घेऊन जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे कुत्रे गायब होण्याच्या घटनांचा या तरुणांच्या व्हिडिओशी काही संबंध तर नाही ना? असा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईच्या वेशीवर असलेल्या कशिश पार्क, परब वाडी, मुलुंड चेक नाका, रहेजा या परिसरातून गेल्या काही दिवसांत भटके कुठे गायब झाले आहेत. सकाळच्या सुमारास 6 ते 7 तरुण येतात, सोसायटीमध्ये फेरफटका मारतात आणि भटक्या कुत्र्यांना लक्ष करून त्यांना पकडतात. तसेच एका गोणीत घालून त्यांना घेऊन जातात.
या भागातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तसेच प्राणिमित्रांनी या टोळीचा कारनामा आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. कुत्रे पकडण्यासाठी येणार्या तरूणांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. हे प्रकरण संशयास्पद असून ही टोळी नेमकि कोण आहे? बेकायदा पद्धतीने भटकी कुत्रे चोरून पुढे कुत्र्यांचे नेमके काय करतात? या कुत्र्यांची कत्तल करून अन्नामध्ये भेसळ करतात का? मुक्या प्राण्यांचा गैरफायदा घेणारे हे समाजकंटक कोण आहेत? असे अनेक प्रश्न प्राणीप्रेमींनी उपस्थित केले आहेत.
मागील काही महिन्यांपासून वारंवार भटके कुत्रे गायब होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. काही संशयास्पद तरुण दररोज येतात आणि भटके कुत्रे घेऊन जातात. या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्त, ठाणे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून याची तपास करण्यात यावा. - मंदार कोळेकर, श्वानप्रेमी
ठाणे महापालिका प्रशासनाकडून श्वानांची निर्बिजीकरण मोहीम सध्या बंद आहे. त्यामुळे श्वानांना पकडण्यासाठी शहरात फिरणारे एकही पथक पालिकेचे नाही अशी माहिती पालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. असे असताना बेकायदा पद्धतीने भटकी कुत्रे चोरणारी टोळीचा बंदोबस्त करण्यात यावा असे मागणी ठाणेकर करीत आहेत.