डोळखांब : शासनाने हिंदी भाषेची सक्ती करण्यापेक्षा शालेय अभ्यासक्रमापासूनच संस्कृत भाषा सक्तीची करावी, असे प्रबोधनात्मक उद्गार शिवव्याख्याते तथा कीर्तनकार हभप शिवाजी महाराज सातपुते यांनी काढले.
डोळखांब परिसरातील बनाचीवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवशी कीर्तन सेवेनिमित्त ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर तसेच चालू घडामोडीवर भाष्य केले. मराठी भाषेला संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांनी चौदाशे वर्षांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. तसेच सरकार हिंदी भाषा सक्तीची करीत आहे. यापेक्षा संस्कृत भाषा सक्तीची केली तर भावी पिढी संस्कारीत होईल.
परमेश्वराच्या कारखान्यातून मानव नावाचे शेवटचे सुंदर मॉडेल पृथ्वीवर पाठवले असून माणसाने या अधुनिक जगात घरातील पाच लोकांना दीड लाख खर्च करून मोबाईल खरेदी केले. परंतु दीडशे रुपयांची ज्ञानेश्वरी घरात आणली जात नाही, ही शोकांतिका देखील व्यक्त केली. वाढदिवसाला इतर भेट वस्तू भेट देण्यापेक्षा ग्रंथ, सविंधान, शिवचरित्र भेट द्या. मूल चारित्र्यवान झाल्याशिवाय राहाणार नाही. झाडे लावा, झाडे जगवा हे सांगतांना नागपूरला समृद्धी मार्ग गेला.
परंतु यामध्ये जी झाडांची कत्तल झाली त्या बदल्यात लागवड झाली नाही, हे निक्षून सांगितले. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले झाडांचे तसेच आयुर्वेदिक वनस्पतीचे महत्व पटवून देत, पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने भविष्यात पाण्याच्या बाटलीप्रमाणे ऑक्सिजनचा बाटला फिरवावा लागणार आहे, यासारख्या विविध विषयांना देखील हात घातला.
दरम्यान बनाचिवाडी येथील या सप्ताहाचे हे 28 वे वर्ष असून सात दिवस या ठिकाणी काकडा, हरिपाठ, कीर्तन, तसेच भजन, ग्रंथ वाचन यासारखे भरगच्च आध्यात्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. तर स्थानिक महाराजांना कीर्तन सेवा दिली जात असून बनाचिवाडी, चोंढे, शेकटवाडी, तसेच बोरीचीवाडी, मोहाचीवाडी येथील भाविक विशेष परिश्रम घेत आहेत.
यावेळी स्वच्छता, संगठन, तसेच भावली सारख्या पाणी योजनेवर व तालुक्यातील पाणी टंचाईवर तसेच धरणांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. त्याचप्रमाणे जीवनात पर्यावरण, प्रशासन, परमार्थ या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत, याची उकल केली. शिवाजी सातपुते महाराज यांचे मनोरंजनातून समाज भंजन (प्रबोधन) मुळे समोर बसलेले भाविक देखील मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले.