शहापूर : राजेश जागरे
शहापूर तालुक्यातील खंडोबाची शेलवली गाव सध्या पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अनेक वर्षांपासून या गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोपट, कावळे, साळुंकी, बगळे, मोर आदी विविध पक्ष्यांची वस्ती निर्माण झाली आहे. विशेषतः हजारो कावळे दररोज संध्याकाळी चारही दिशांनी येथे मुक्कामासाठी येत असल्याने गावात वेगळीच नैसर्गिक गजबज अनुभवायला मिळत आहे.
गावालगत असलेली उंच झाडे, शेती परिसर आणि शांत वातावरणामुळे पक्ष्यांसाठी हा भाग सुरक्षित आश्रयस्थान ठरला आहे.
अनेक वर्षांपासून दृष्टीआड राहिलेल्या शेलवली गावात पूर्वीपासूनच पक्ष्यांचे वास्तव्य आहे. संध्याकाळच्या वेळी आकाशात काळ्या ढगांसारखा भास होईल इतक्या मोठ्या संख्येने कावळ्यांचे थवे झाडांवर विसाव्यासाठी दाखल होतात. स्थानिक ग्रामस्थ गणपत दुधाळे यांच्या मते, मागील काही वर्षांत पक्ष्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. “पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कावळे दिसत नव्हते. आता मात्र संध्याकाळी हजारोंच्या संख्येने ते झाडांवर येतात. त्यांचा किलबिलाट आणि आवाज संपूर्ण गावात घुमत असतो,” असे त्यांनी सांगितले.
पोपट व साळुंकी यांची उपस्थिती गावासाठी अभिमानाची बाब ठरत आहे, तर पहाटेच्या सुमारास मोरांचा आरव ग्रामस्थांसाठी आनंदाचा क्षण ठरतो.
पर्यावरणप्रेमींच्या मते, जैवविविधतेच्या दृष्टीने हा सकारात्मक संकेत असून गावातील नैसर्गिक संतुलन टिकून असल्याचे हे लक्षण आहे. तज्ज्ञांच्या मते, मोठ्या प्रमाणावर पक्षी एखाद्या ठिकाणी येत असतील तर तेथील पर्यावरण, अन्नसाखळी आणि सुरक्षितता योग्य असल्याचे द्योतक असते. मात्र मानवी हस्तक्षेप, झाडांची तोड किंवा प्रदूषण वाढल्यास ही नैसर्गिक वस्ती धोक्यात येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
पक्ष्यांच्या या सहवासामुळे शेलवली गावाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. योग्य नियोजन आणि संवर्धन केल्यास हे गाव ‘पक्षी पर्यटन’ केंद्र म्हणून विकसित होऊ शकते, असा विश्वास पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.
निसर्ग आणि मानव यांच्यातील सहजीवनाचे सुंदर उदाहरण ठरलेले खंडोबाची शेलवली गाव सध्या खऱ्या अर्थाने पक्ष्यांचे माहेरघर बनले आहे.
“आमच्या गावात पक्ष्यांची वस्ती असणे हे निसर्गाशी जुळलेले सुंदर नाते दर्शवते. पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळीच गावात उत्साह पसरतो. त्यांच्या उपस्थितीने गाव अधिक आनंदी वाटते. पक्ष्यांमुळे पर्यावरणाचे संतुलन आणि जैवविविधतेचे जतन होते. आमचे गाव पक्षी पर्यटन केंद्र व्हावे, यासाठी शासनाकडे मागणी करणार आहोत,”
— विनायक पवार, उपसरपंच, ग्रामपंचायत कासगाव-शेलवली (ख)
शेलवली गावात धार्मिक आणि नैसर्गिक वारसा एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतो. येथील डोंगररांगांच्या सान्निध्यात वसलेले श्री खंडोबाचे जागृत देवस्थान भाविकांचे आकर्षण ठरते. दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला येथे खंडोबाची यात्रा भरते आणि भाविकांची लक्षणीय गर्दी होते.
खंडोबा मंदिराभोवतीचा परिसर हिरवागार असून जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे विविध प्रकारचे स्थानिक पक्षी आढळतात. पहाटे आणि संध्याकाळी पक्ष्यांचा किलबिलाट विशेष आकर्षण ठरतो. निसर्गप्रेमींसाठी हा परिसर अभ्यासाचा विषय ठरत आहे. झाडांची दाटी आणि उपलब्ध पाणीस्रोत पक्ष्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करतात.
पावसाळ्यात हा परिसर अधिक निसर्गरम्य बनतो, तर धुक्याच्या सान्निध्यात मंदिराचे सौंदर्य अधिक खुलते. हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांची उपस्थितीही वाढते. त्यामुळे छायाचित्रकार आणि पर्यटकांसाठी हा परिसर विशेष आकर्षण ठरत आहे.