राजेश जागरे
शहापूर: समृद्धी महामार्गावर दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने अनेक वाहनचालक चुकीच्या दिशेने जात प्रवास करत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.समृद्धी महामार्गावरील कोळकेवाडी परिसरात तसेच खुटघर टोल नाक्याच्या हद्दीत सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. यामुळे मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
या परिसरात शहापूर बाजूच्या विद्युत पोलवरील लाईट सुरू असताना मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लाईट बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याची स्पष्ट कल्पना येत नाही.
याशिवाय खुटघर टोल नाक्याच्या हद्दीत दिशादर्शक फलकांचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याने अनेक वाहनचालक चुकीच्या दिशेने जात प्रवास करत असल्याचे प्रकार घडत आहेत. वाहन चालकांना दिशादर्शकाअभावी योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे काही वाहनचालक उलट दिशेने प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे.
यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. वेगवान समृद्धी महामार्गावर अशी परिस्थिती निर्माण होणे अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देऊन प्रकाश व्यवस्था सुरळीत करावी तसेच आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी केली जात आहे.
समृद्धी महामार्गासारख्या अत्याधुनिक प्रकल्पावर मूलभूत सुरक्षा सुविधांचा अभाव असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. खुटघर टोल परिसरात दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालक उलट्या दिशेने जात आहेत. रात्रीच्या वेळी मुरबाड बाजूची लाईट बंद असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात मोठी जीवितहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.- शैलेश भालके, सामाजिक कार्यकर्ते