डोंबिवलीच्या निवासी विभागात स्वयंपुनर्विकास हाच शाश्वत उपाय pudhari photo
ठाणे

Raju Patil : डोंबिवलीच्या निवासी विभागात स्वयंपुनर्विकास हाच शाश्वत उपाय

मनसे नेते राजू पाटील यांनी सुचवला पर्याय, पाणी, वीज, रस्ते सुविधांवर ताण येणार नाही

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील जुन्या इमारतींच्या रीडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकासाबाबत सद्या रहिवाशांच्या बैठका व चर्चा सुरू आहेत. मात्र रीडेव्हलपमेंट करण्यापूर्वी येथील मूलभूत समस्यांची सोडवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या काळात या भागात समस्यांचा महाडोंगर उभा राहील. मात्र या साऱ्या पार्श्वभूमीवर रहिवाशांच्या हितासाठी बिल्डरांशिवाय स्वयंपुनर्विकास हाच शाश्वत उपाय असल्याचा पर्याय मनसेचे अभ्यासू नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी सुचविला आहे. या भागातील रहिवाशांनी माजी आमदार तथा मनसे नेते राजू पाटील यांच्याशी या विषयावर सहकार्य करण्यासाठी संपर्क साधला.

रहिवाशांच्या मदतीला नेहमीच धावून जाणाऱ्या राजू पाटील यांनी साद देताना काही महत्वाच्या टिप्स दिल्या. पाणी, ड्रेनेज, रस्ते, कचरा व्यवस्थापन, पार्किंग यासारख्या मूलभूत समस्या तशाच ठेवून जर रीडेव्हलपमेंट केले गेले, तर भविष्यात या भागात समस्यांचा महाडोंगर उभा राहिल. वाढीव एफएसआयमुळे लोकसंख्या दुप्पट-तिप्पट वेगाने वाढेल आणि सद्याच्या अपुऱ्या सुविधांवर ताण येऊन रहिवाशांना येथे राहणे मुश्किल होईल, असेही भाकित राजू पाटील यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना वर्तविले.

यावर पर्याय म्हणून स्वयंपुनर्विकास अर्थात सेल्फ रीडेव्हलपमेंटचा मुद्दा त्यांनी मांडला. ते म्हणाले, शक्यतो निवासी विभागामधील रहिवाशांनी रीडेव्हलपमेंट हे फक्त स्वतःपुरते करावे, म्हणजे आहे त्या जागेत केवळ स्वतः च्या घराचा एरिया वाढवून घ्यावा. यासाठी कोणत्याही बिल्डरची आवश्यकता भासणार नाही. सोसायटीने किंवा व्यक्तिगत रहिवाशाने एकत्र येऊन प्रकल्प राबवला तर अतिरिक्त सदनिका बाजारात विकल्या जाणार नाहीत. अशा स्वयंपुनर्विकासासाठी लागणारे अर्थसाह्य वित्तीय संस्था/बँकांकडून सोसायटीला किंवा व्यक्तिगत रहिवाशाला कर्जाच्या स्वरूपात सहज मिळू शकेल, असेही राजू पाटील यांनी या संदर्भात सुचविले आहे.

तसे केल्यास एकीकडे रहिवाशांना मोठे घर मिळेल आणि दुसरीकडे लोकसंख्या नियंत्रणात राहील. लोकसंख्या मर्यादित राहिल्याने प्रशासनालाही पाणी, वीज, रस्ते, मलनिस्सारण यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अधिक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसंख्येच्या ताणामुळे पायाभूत सुविधा कोलमडतात

सद्या बिल्डरांच्या माध्यमातून होणाऱ्या रीडेव्हलपमेंटमध्ये अतिरिक्त एफएसआय वापरून मोठ्या टॉवर्सची उभारणी केली जाते. परिणामी फ्लॅटची संख्या वाढते, लोकसंख्येचा ताण येतो आणि शासन/प्रशासनाकडून सद्या मिळणाऱ्या आहे त्या पायाभूत सुविधा कोलमडून पडतात. त्यामुळे रहिवाशांनी केवळ घर मोठे करण्यापुरता विचार करावा, बिल्डरच्या नादाला लागू नये, असे आवाहन राजू पाटील यांनी या पार्श्वभूमीवर केले आहे. एमआयडीसी निवासी विभागातील रहिवाशांनी रीडेव्हलपमेंटचा निर्णय घेण्यापूर्वी या सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन राजू पाटील यांनी या पार्श्वभूमीवर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT