Shivaji Maharaj statue repair Pudhari
ठाणे

पुतळा दुरुस्तीवरून लोकांची दिशाभूल करू नये; आ. नरेंद्र मेहता यांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सल्ला

शहरात छत्रपतींचा पुतळा हटविण्यावरून राजकारण तापल्याप्रकरणी आ. मेहता यांनी शुक्रवारी भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर: मिरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची अवस्था जीर्ण झाल्याने त्याची दुरुस्ती करणे अत्यावश्यक ठरली आहे. मात्र काही लोकं हा पुतळा हटविण्याची दिशाभूल लोकांमध्ये करू लागले आहे. त्यांनी ती करू नये, असा सल्ला आ. नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिला आहे.

शहरात छत्रपतींचा पुतळा हटविण्यावरून राजकारण तापल्याप्रकरणी आ. मेहता यांनी शुक्रवारी भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी वरील सल्ला देत या पुतळ्याची वेळीच दुरुस्ती न केल्यास भविष्यात त्याला काही झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला.

हा पुतळा 30 वर्षांपूर्वी उभारण्यात आला असून त्याच्या अनेक भागांची दुरावस्था झाल्याने त्याचे पालिकेकडून ऑडिट करण्यात आले. त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये पुतळ्याच्या दुरुस्तीबाबत नमूद करण्यात आल्याचे मेहता यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच हा पुतळा मेट्रो मार्गाच्या खाली आला असून त्याच्या समोरच मेट्रो मार्गाचा पिल्लर आला आहे.

त्यामुळे समोरून पुतळा योग्यरितीने दिसत नाही. त्यामुळे पुतळ्याच्या दुरुस्तीनंतर तो योग्य ठिकाणी स्थानापन्न करणे सत्ताधारी म्हणून आपले कर्तव्य असून तसा निर्णय यापूर्वी सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील परवानगी दिल्याचे त्यांनी म्हटले.

मात्र सरनाईक यांनी पुतळ्याच्या दुरुस्तीवरून राजकारण करून लोकांची दिशाभूल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पुतळ्याची दुरुस्ती करायची नाही का, पुतळा मेट्रो मार्गाखाली आल्याने भविष्यातील संभाव्य अपघात वा दुर्घटना टाळण्यासाठी पुतळा योग्य ठिकाणी स्थलांतर करणे आवश्यक नाही का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित करून पुतळ्यावरून लोकांची दिशाभूल करू नये, असा सल्ला मेहता यांनी सरनाईक यांना दिला आहे.

माझ्यावर 4 पेक्षा जास्त केसेस असल्यास राजकारण सोडेन !

सरनाईक यांनी आपल्यावर 28 केसेस दाखल असल्याचा आरोप केला असून तो खोटा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्यावर सध्या केवळ 4 केसेस असून 28 पैकी 24 केसेस निकाली निघाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जर सरनाईक यांनी केलेल्या आरोपानुसार आपल्यावर 4 पेक्षा जास्त केसेस असल्यास आपण राजकारण सोडून देऊ मात्र सरनाईक यांनी 28 केसेस असल्याचे सिद्ध न केल्यास ते राजकारण सोडतील का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT