ठाणे

Malangwadi river pollution : शहरीकरणामुळे मलंगवाडीची नितळ नदी मृत्यूशय्येवर

Thane news | जल, जंगल, जमिनीसह जीवसृष्टी वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साद

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कधी काळी स्वच्छ आणि नितळ वाहणारी मलंगवाडीची पावसाळी नदी आज शहरीकरणाच्या विळख्यात सापडून मृतावस्थेत जात आहे. मलंगवाडी, खरड, ढोके, कुंभार्ली, बालेगाव, शिरढोण, खोणी, पलावा या आठ गावांची जीवनवाहिनी असलेली ही नदी वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे.

ही नदी पावसाळी असली तरी बाराही महिने गावांच्या उपजीविकेचा आधार होती. नदीला ठिकठिकाणी छोटे छोटे बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्याच्या पाण्यावर गावांची शेती फुलायची. गुरेढोरे पाणी प्यायचे. धुणी-भांडी व्हायची. पावसाळ्यात वलगन आणि मासेमारी करून स्थानिक रहिवासी आपली उपजीविका चालवायचे. तथापी वाढत्या शहरीकरणामुळे आता या नदीचा श्वास कोंडला आहे. सिमेंटच्या जंगलात नदी हरवत चालली आहे. पात्रात कचरा, प्लास्टिक आणि सांडपाणी मिसळत आहे. बंधारे गाळाने भरले आहेत.

पाण्याची पातळी खालावली आहे. नदीचे नैसर्गिक प्रवाह अडवले जात आहेत. त्यातच जलपर्णीमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हीच जलपर्णी नदीचे पाणी दुषित करते. मोठ्या प्रमाणावर पाणी शोषूनही घेते. या जलपर्णीमुळे पाण्यात ऑक्सिजन व सूर्यप्रकाश देखील पोहोचू शकत नाही. त्यामुळे जीवसृष्टीला अर्थात जलचरांनाही धोका उत्पन्न झाला आहे. परिणामी एकेकाळी खळखळ वाहणारी नदी आता संपण्याच्या मार्गावर आहे. वेळीच या नदीला पुनर्जीवित केले नाही तर ती कायमची नष्ट होईल, अशी भिती सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कोकाटे यांनी व्यक्त केली आहे.

शासन/प्रशासनासह लोकप्रतिनिधींपुढे आव्हान

या साऱ्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कोकाटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मनसेचे नेते तथा माजी आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, स्थानिक नगरसेवक, आजी-माजी सरपंच, प्रतिष्ठित गावकरी, पर्यावरण प्रेमी व सर्व सहकाऱ्यांना नदी वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला हवेत. ही नदी वाचवा. आमच्या या गावांचे सौभाग्य पुन्हा परत आणा. गावांचे गावपण अबाधित राहू द्या. वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गाचा ऱ्हास होऊ देऊ नका, अशी आर्त हाक शशिकांत कोकाटे यांनी दिली आहे.

...अन्यथा जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात

शेतीसह जल, जंगल, जमीन, नदी, निसर्ग आणि जीवसृष्टी वाचविणे ही आता केवळ घोषणा नाही तर काळाची हाक आहे. मलंगवाडी नदी म्हणजे फक्त वाहते पाणी नव्हे, ती आठ गावांच्या नसानसांत भिनलेली संस्कृती आहे. तीच या मातीची ओळख, परंपरेची मुळे आणि लाखो जीवांच्या जगण्याचा श्वास आहे. या नदीच्या काठावरच पिढ्यान् पिढ्यांचे बालपण बागडले, सण साजरे झाले आणि शेती बहरली. हीच नदी जर उध्वस्त झाली, गाळासह कचऱ्यात गुदमरून मृत झाली, तर केवळ पाणी आटणार नाही तर या गावांचे गावपण कायमचे संपेल. संस्कृतीचे संदर्भ पुसले जातील. पुढच्या पिढीला सांगायला नदीच्या फक्त गोष्टीच उरतील. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने कागदी घोडे नाचविणे थांबवून तातडीने कृतीच्या मैदानात उतरावे. नदीचे पुनरूज्जीवन ही आता पर्यावरणाची नव्हे तर अस्तित्वाची लढाई आहे, हे ओळखून तात्काळ ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT