Gram Panchayat Pudhari
ठाणे

Maharashtra Gram Panchayat Election: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल; 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेला सुरुवात

4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर; ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या काळात संपत आहे, तसेच ज्या नवीन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत, त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग (वॉर्ड) रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 20 फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेचे काम सुरू होणार असून ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना 7 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे. प्रभाग रचनेची प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तहसीलदार गुगल अर्थच्या मदतीने 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत गावांचे नकाशे अंतिम करतील. तलाठी आणि ग्रामसेवक 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रत्यक्ष पाहणी करून प्रभाग निश्चित करतील. जिल्हाधिकाऱ्यांकडून संक्षिप्त तपासणी झाल्यानंतर 23 मार्च 2026 पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला मान्यता देईल, असे ग्रामविकास विभागाने म्हटले आहे. याबाबतचे आदेश ग्रामविकास विभागच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी जारी केले आहेत.

13 एप्रिल 2026 पर्यंत हरकती नोंदवण्याची संधी

ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेबाबत हरकती मागवण्यासाठी 7 एप्रिल 2026 रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल. नागरिकांना आपल्या हरकती 13 एप्रिल 2026 पर्यंत नोंदवता येतील. प्राप्त हरकतींवर 21 एप्रिल 2026 पर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून 28 एप्रिल 2026 पर्यंत प्रभाग रचना अंतिम करतील आणि ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाईल; तर 4 मे 2026 रोजी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहे.

रायगड जिल्ह्यातील 83 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणास्तव रिक्त असलेल्या सदस्य पदांकरिता पोटनिवडणूका घ्याव्या लागणार आहेत. त्या जिल्हाधिकाऱ्यांनी 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यावरच होतील. त्याच बरोबर या दरम्यानच्या काळात रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपणार आहे. या 240 ग्रामपंचायतींच्या निडणूकां 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यावर घ्यायच्या का, याबाबत आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवत आहोत. ते प्राप्त झाल्यावर त्यानुसार पुढील प्रक्रीया अमलात आणली जाईल.
डॉ.रविंद्र शेळके, उप जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा निवडणूक विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT