ठाणे : दिलीप शिंदे
सूर्य आग ओकत असताना गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील सर्व धरणांमध्ये 7 टक्क्यांपेक्षा अधिकचा पाणीसाठा उपलब्ध असणे ही बाब दिलासादायी आहे. राज्यातील लहान-मोठ्या 2 हजार 994 धरणांमध्ये बुधवारपर्यंत 47.41 टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हाच जलसाठा 40.80 टक्के एवढा होता.
तसेच, ठाणे, मुंबईसह कोकणाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 47.48 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील दुर्गम तसेच ग्रामीण भाग वगळता शहरी भागाला 15 जूनपर्यंत मुबलक पाणीपुरवठा होत राहील, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यातील 2 हजार 994 लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये 15 एप्रिलपर्यंत 19 हजार 366 द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी या धरणांमध्ये 40.80 टक्के पाणीसाठा होता.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्प मिळून 173 धरणे असून, आजमितीला त्या धरणांमध्ये 1 हजार 795.72 द.ल.घ.मी. म्हणजे 48.47 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच दिवशी 50.66 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा दोन टक्क्यांनी पाण्याचा उपसा अधिक झाला असला, तरी आगामी दोन महिने पाणी उपलब्ध होईल एवढा जलसाठा आहे, हे वृत्त मुंबई, ठाणेकरांना दिलासा देणारे आहे.
पुणे ः 41.80 टक्के पाणीसाठा
पुणे विभागातील 724 धरणांमध्ये 41.80 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी हा पाणीसाठा 34.94 टक्के होता. यंदा 7 टक्के पाणीसाठा अधिक असला, तरी वाढत्या तापमानामुळे पुणेकरांची चिंता वाढलेली आहे.
नाशिक ः 48.88 टक्के पाणीसाठा
नाशिक विभागाच्या 537 धरणांमध्ये 48.88 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी हा पाणीसाठा 43.96 टक्के होता. सुमारे 5 टक्क्यांनी धरणांतील जलसाठे अधिकचे आहेत.
छ. संभाजीनगर ः 52.46 टक्के पाणीसाठा
छ. संभाजीनगर विभागातील 929 धरणांमध्ये 52.46 टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी याच दिवशी 41.47 टक्के पाणी धरणांमध्ये शिल्लक होते. यंदा धरणांमध्ये 11 टक्के अधिकचा पाणीसाठा उपलब्ध असणे ही बाब मराठवाड्याला दिलासा देणारी आहे.
अमरावती ः 54.15 टक्के पाणीसाठा
अमरावती विभागातील 261 धरणांत 54.15 टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी याच दिवशी 48.44 टक्के पाणीसाठा धरणांमध्ये होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी पाणीसाठा अधिक आहे.
नागपूर ः 49.48 टक्के पाणीसाठा
नागपूर विभागातील 383 धरणांमध्ये 49.48 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षी याच दिवशी 40.60 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. नागपुरात गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठा चांगला असल्याने फारशी चिंता भेडसावणार नाही. राज्यात 15 जूनपर्यंत जनतेला दिलासा मिळेल, अशी जलसाठ्याची परिस्थिती आहे.