how many students died in ashram school in last 2 years
ठाणे : दिलीप शिंदे
आश्रमशाळांमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे झालेले आकस्मिक मृत्यू त्यामुळे आश्रमशाळा की मृत्यूचे सापळे असा सवाल उपस्थित होत असून अनुदानित शासकीय आश्रमशाळांमध्ये ५८४ विद्यार्थ्यांचेे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
५८४ विद्यार्थ्यांचेे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे झालेले विद्यार्थ्यांचे मृत्यू संशयास्पद असून मृत्यूच्या कारणामध्ये सर्पदंश, विंचूदंश अशी कारणे देण्यात आली आहेत. मात्र ही कारणे समाधानकारक वाटत नसल्याने या मृत्यूंच्या चौकशीची मागणी होऊ लागली आहे.
गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेत नुकत्याच झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने मृत्यूच्या घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांच्या सुरक्षेचा आणि दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. हे वास्तव केवळ एका घटनेपुरते मर्यादित नसून अत्यंत विदारक आहे.
आदिवासी विकास विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांत (२०२४ ते २०२६) राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळां मधील ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यास आश्रमशाळेच्या सुविधांसाठी आर्थिक तरतुदीची कमतरता व अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांना जीव गमवावे लागत आहेत.
राज्यात दोन वर्षांत सरकारी आश्रमशाळांमध्ये ३६४, तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये २०० विद्यार्थ्यांनी जीव गमावला आहे. मृत्यूच्या कारणांमध्ये गंभीर आजार २७३ मृत्यू (४७ टक्के) आणि अपघात २२८ मृत्यू (३९ टक्के) हे सर्वात मोठे घटक आहेत. याशिवाय नैराश्यातून गळफास (५५ मृत्यू) आणि सर्पदंश, विंचूदंश (२८ मृत्यू) यामुळेही विद्यार्थ्यांनी प्राण गमावले आहेत. यातील ३६ मृत्यू प्रत्यक्ष शाळा परिसरात तर उर्वरित विद्यार्थी आजारपणामुळे घरी किंवा रुग्णालयात दगावल्याचे अहवालात नमूद आहे. या मृत्यूंमागे आश्रम-शाळांतील अस्वच्छता, कुपोषण, आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही प्रमुख कारणे आहेत.
२०१७ मध्ये ‘पीडब्ल्यूसी’ आणि ‘टाटा इन्स्टिट्यूट’ने केलेल्या सर्वेक्षणात आश्रम शाळांमधील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले होते. दुर्गम भागात असलेल्या या शाळांना संरक्षक भिंत नाही, विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी खाटा नाहीत, ५० टक्के शाळांमध्ये वर्ग खोल्यांचाच वसतिगृह म्हणून वापर होतो आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मोठा अभाव आहे.
जपतलाई आश्रमशाळेतही विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्यानेच त्यांना सर्पदंश झाला. आजारपणात तातडीच्या उपचारांसाठी बहुतांश शाळांकडे स्वतःची वाहने नसल्याने वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नाही. हा अहवाल सरकारला देऊनसुद्धा त्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास प्रशासनाने कानाडोळा केल्याचे दिसून आले आहे.
सध्या राज्यात ५०० सरकारी आणि ५५६ अनुदानित आश्रम- शाळांमध्ये मिळून साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. असे असूनही विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा न मिळणे, हे व्यवस्थेचे मोठे अपयश आहे. शासनाने केवळ कागदी सोपस्कार करण्यापेक्षा ठोस अर्थसंकल्पीय तरतूद करून पायाभूत सुविधांची उभारणी केली नाही, तर निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी असेच जात राहतील.
महाराष्ट्रात १५ जिल्ह्यांमध्ये आदिवासींची संख्या असून त्या जिल्ह्यांमध्ये आश्रमशाळासुद्धा आहेत. पीडब्लूसी या संस्थेने अहमदनगर, अमरावती, धुळे, जळगाव, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, रायगड, ठाणे आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांतील १५७ आश्रमशाळांमध्ये सर्वेक्षण केले होते.