Ganpati Special Trains pudhari photo
ठाणे

Konkan Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासाठी २५ लाख चाकरमानी जाणार कोकणात; रेल्वे, एसटी फुल्ल

केरळमपर्यंत विशेष गाड्या धावणार

पुढारी वृत्तसेवा

प्रियानी पाटील

ठाणे: लाखो चाकरमान्यांचे स्नेहबंध जुळलेला गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यासाठी मुंबईसह भारतभरातून २५ लाख चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. या गणेशोत्सवासाठी गुजरात, महाराष्‍ट्रासह कर्नाटक, केरळमपर्यंत विशेष गाड्या धावणार आहेत. एकूण ५०० विशेष गाड्या धावणार आहेत.

तर दुसऱ्या बाजूला एसटीने ५ हजार विशेष गाड्या सोडण्‍याची तयारी केली आहे. गौरी गणपती सणापर्यंत कोकणातील प्रत्येक गाव गणेशोत्सवापर्यंत जागा होणार आहे. कोकणात बंद असलेली तीन लाखांपेक्षा जास्त घरे गणेशोत्सवात उघडली जाणार आहेत.

गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना लाखो चाकरमान्यांना आता कोकणात जाण्याचे वेध लागले आहेत. कोकणातील सण, उत्सव, परंपरा जपताना कोकणी माणूस आणि गणेशोत्सव असे एक अतुट नाते राहिले आहे. खास गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणाची वाट धरताना दिसून येत असल्यामुळे या काळात मुंबई-गोवा महामार्ग लाखो चाकरमान्यांच्या आगमनाने गजबजून जाणार आहे.

एसटी, ट्रॅव्हल्स बसेस, खासगी गाड्या, विशेष बस सेवा, कोकण रेल्वे आदी वाहतूक व्यवस्था कोकणातील गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास चाकरमान्यांसाठी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या उत्सव काळात १०-१२ दिवसांत कोकणाला माणसांची झळाळी प्राप्त होते. एरव्‍ही वर्षभर बंद असलेली घरे कोकणात गणेशोत्सवाच्या निमित्ताने उघडतात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत घराघरात टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाच्या आरती, भजनाचे सूर घुमू लागतात.

कृत्रिमपेक्षा नैसर्गिक साहित्‍याला महत्त्‍व

कोकणात गणेश चतुर्थीच्या सणाला मोठे महत्त्व आहे. अगदी इथल्या माणसांपासून निसर्गरम्य भासणारी प्रत्येक गोष्ट या सणाला महत्त्वपूर्ण म्हटले तरी वावगी ठरणार नाही. दुर्वा, केळीच्या पानापासून साग, वडाच्या पानांनाही पूजेत महत्त्वाचे स्थान आहे. तशी पावसात फुलणारी फुले वेली ही गणरायाच्या आगमनात, सजावटीत उपयुक्त ठरतात.

कृत्रिम फुलांपेक्षा दारीं फुलणाऱ्या फुले गणरायाच्या चरणी अर्पण केली जातात. दारीं सडे रांगोळ्या पडतात. उत्सव सुरु होण्यापूर्वी चार दिवस आधीपासून दारीं तोरण, मंडपी सजावटीच्या तयारीला वेग येतो. एक अनोखा उत्साह लहानापासून मोठ्यांपर्यंत संचारतो. साफसफाई ते जय्यत तयारी असा क्रम उत्साह ते उत्सवादरम्यान दिसून येतो.

कोट्यवधीची उलाढाल

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या सर्व कोकणातील जिल्ह्यात चाकरमानी मुंबईतून कोकणात दाखल होताना गणेशोत्सवसाठी प्रचंड खरेदीची उलाढाल होते. गणपती विराजमान होण्यासाठी मखर, सजावट साहित्य, मोदक, लाडू, आदी गोडधोड खाद्य, नैवेद्य, आराशीचे साहित्य, कंठी, मुकुटमणी, ते पाट पूजेचे साहित्य खरेदी केली जाते.

विशेष म्हणजे गणपतीची मूर्ती कोणती हवी ते आधीच गणेशमूर्ती कारखान्यात पसंती करून गणरायाच्या आगमनाची तयारी केली जाते. शेकडो वर्षाची परंपरा जपला गेलेला कोकणातील गणेशोत्सव अमाप उत्साहात साजरा होतो.

चाकरमान्यांसाठी विशेष बस, रेल्वे फेऱ्या

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने ५,२२० जादा एसटी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत एकूण ५,२२० जादा एसटी बसेस धावणार आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने एकत्रितपणे २६२ हून अधिक विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT