ठाणे येथे विविध विकासकांमाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मान्यवर Pudhari Photo
ठाणे

विकासकामे थांबवणार्‍यांना सत्तेपासून लांब ठेवा : पंतप्रधान मोदी

मोदींनी ठाण्यातून फुंकले विधानसभेचे रणशिंग

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : महाविकास आघाडी म्हणजे लटकाना, अटकाना आणि भटकाना अशा वृत्तीची ही महाविकास आघाडी आहे. महायुतीच्या सर्व योजना बंद करण्याची यांची नीती आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे महाभ्रष्टाचारी पक्ष आहे. आमच्या विकासकामांना बंद पाडण्याचे काम ते सतत करतात. मेट्रो 3 चे काम रोखल्यामुळे 1414 हजार कोटींचा खर्च वाढला आणि जतनेच्या खिशातून पैसे गेले. अशा नीतीच्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे येथील सभेत केले. ठाण्यामध्ये शनिवारी (दि.5) 33 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि विविध योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पंतप्रधानांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ठाण्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी जनतेशी मराठीतून संवाद साधला. तसंच, महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय, असं म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची आई रेणुका आणि वणीची सप्तश्रुंगी देवी यांना मी कोटी कोटी वंदन करतो. मी ठाण्याच्या धरतीवर कोपिनेश्वर मंदिरच्या चरणी प्रणाम करतो. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचंही नमन करतो. आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा फक्त महाराष्ट्राचा आणि मराठीचा सन्मान नाही तर मराठी साहित्य कला आणि संस्कृतीचा देखील सन्मान आहे. मी देशातील सर्व मराठी बोलणार्‍यांना शुभेच्छा देतो. ठाण्यात येण्याच्या आधी मी वाशिममध्ये होतो. त्या ठिकाणी नऊ कोटी शेतकर्‍यांना किसान सन्मान निधी जारी करण्याचा योग मला प्राप्त झाला.

आजच्या दिवसाची अनेक लोक वाट पाहत होते, असे मोदी म्हणाले. आम्हाला विकास कारायचा आहे आणि याआधी काँग्रेसने केलेल्या खड्यांनाही भरायचं आहे. विकसित भारत हे एनडीए सरकारचं लक्ष्य आहे. असे अनेक काम आहेत ते आम्ही मार्गी लावले आहेत. आमच्या सरकारने ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम केलं आहे. असे अनेक प्रकल्प आहेत ते आम्ही मार्गी लावले आहेत. आता ते जर मोजायला गेलो तर दिवस कमी पडेल, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, महाविकास आघाडीला संधी मिळाली की ते विकासाचे काम थांबवण्याचे काम करतात. मुंबई मेट्रो हे देखील त्याचच एक उदाहरण आहे. महाविकास आघाडीला फक्त विकास थांबवण्याचं काम येतं.

मात्र, विकासकाम थांबवणार्‍यांना आता सत्तेपासून लांब ठेवा. महाविकास आघाडी जोपर्यंत सत्तेत होती, तोपर्यंत अनेक प्रकल्पाचं काम थांबवलं. अडीच वर्ष काम थांबवल्यामुळे मेट्रोचा खर्च 14 हजार कोटींनी वाढला. मग हे पैसे कोणाचे होते? सर्व सामान्य नागरिकांनी भरलेला टॅक्सचे होते, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी महाविकास आघाडीवर केला. 33 हजार कोटींचे प्रोजेक्ट सुरू झाले. रिंग रूट ठाणे, नयना प्रोजेक्ट छेडा नगर ते आनंद नगर अशा नव्या विकासकामांचा शिलान्यास झाला. ठाण्यातून महाराष्ट्राच्या आधुनिक विकासाची सुरुवात तांत्रिक तंत्रज्ञानातून विकासात मोठे योगदान दिले. त्याबद्धल जपानचे विशेष आभार मानत जपान मैत्रीचे हे प्रतीक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

मविआ, प्रामुख्यानं काँग्रेसवर निशाणा

महायुती सरकारनं महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली, यात महिलांना 1,500 रुपये महिना आणि 3 एलपीजी सिलेंडर मोफत मिळत आहेत. मविआ याचीच वाट पाहतेय की यांना संधी मिळाल्यास ते सर्वात आधी शिंदे यांच्यावर राग काढतील आणि त्यानी आणलेल्या योजनांना ताळे लावून टाकतील. हा पैसा बहिणींच्या हातात नको तर त्यांच्या दलालांच्या खिशात जावेत असं मविआला वाटतं आहे, अशा घणाघाती शब्दांत मोदींनी मविआ आणि प्रामुख्यानं काँग्रेसवर निशाणा साधला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT