पुढारी ऑनलाईन डेस्क : आज देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५५ वी जयंती साजरी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सर्व देशवासियांच्या वतीने आम्ही आदरणीय बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. सत्य, समरसता आणि समतेवर आधारित त्यांचे जीवन आणि आदर्श देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील.
पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही श्रद्धांजली वाहिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, 'माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केले.'
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विजय घाटावर त्यांना पुष्पांजली अर्पण केली.