कल्याण/डोंबिवली: कल्याणच्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीतील एका कैद्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ऋषिकेश पवार असे या कैद्याचे नाव आहे. दरम्यान प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा बळी गेल्याचा गंभीर आरोप कैद्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, ऋषिकेशला उपचारासाठी रुग्णवाहिकेऐवजी खासगी बोलेरो गाडीतून रुग्णालयात आणण्यात आले. 5 वाजता छातीत दुखत असताना त्याला 9 वाजेपर्यंत रुग्णालयात का आणले नाही? अस सवाल उपस्थित करत नातेवाईकांनी उल्हासनगरच्या रुग्णालयात गोंधळ घातला. डोंबिवलीचा रहिवासी ऋषिकेश हा आधारवाडी न्यायालयीन कोठडीत होता.
20 एप्रिल रोजी एका आठवडा बाजारात झालेल्या वादातून त्याच्यावर गुन्हा दाखल होता. मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास ऋषिकेशच्या छातीत दुखू लागले. मात्र यावेळी त्याला खासगी गाडीतून त्यांना आणण्यात आले होते. मात्र त्याला वेळेवर रुग्णालयात नेण्यात आले असते, तर तो वाचला असता, संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत दोषींवर कारवाईची मागणी केली.
या प्रकरणी न्याय मिळाला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही कुटुंबीयांनी दिला. यासंदर्भात आधारवाडी कारागृहाचे अधीक्षक प्रदीप जगताप यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कैदी ऋषिकेशला मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास चक्कर आली. त्याला श्वनासाचा त्रास होऊ लागला.
त्याला कारागृहातील शिपायाने पाहिले. तत्काळ कारागृहातील परिचारिकेस बोलावून कारागृह वैद्यकीय कक्षात आणले. त्याचा रक्तदाब तपासला असता तो कमी झाला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सरकारी रुग्णवाहिकेतून त्याला तत्काळ पुढील उपचारास उल्हासनगर मध्यवर्ती सरकार रुग्णालयात नेले.
त्याची तपासणी केली त्यानंतर त्याला रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले. ऋषिकेशचा उपचारासाठी कारागृह प्रशासनाने तत्परता दाखवत वेळीच दखल घेत आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी केलेला आरोप चुकीचा आहे.
यापूर्वीही संशयास्पद मृत्यू
यापूर्वीही तुरुंगामध्ये संशयास्पद मृत्यू झाले होते. तुरुंगातून नेताना आरोपींचा एन्काउंटरही झाल्याचे प्रकार घडले आहेत. अक्षय शिंदे यांचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. त्याची चौकशी अद्यापही सुरू आहे. पोलीस अधिकारी यात दोषी असल्याचे सांगितले जाते. परंतु पुढे काही घडले नाही