भिवंडी : सुमित घरत
सततच्या हवामानातील बदलाने खरीप हंगामातील भातशेती आणि रब्बी हंगामातील भाजीपाला लागवड पूर्णपणे बेभरवशाची झाल्याने शेतकरी राजा अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. त्यातच प्रशांत महासागरातील अल निनो आणि सुपर अल निनो सारखी परिस्थिती निर्माण होऊन मान्सूनमध्ये कमी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेल्याने ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक असून नुकसानीची भीती असून याबाबत शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे.
अशातच बदलत्या हवामानातील अनिश्चितेमुळे शेतकऱ्यांना फळझाड, फुलझाड (फलोत्पादन) लागवडीचा प्रयोग नवसंजीवनी देणारा ठरू शकतो. यात कुठलेही दुमत नसून शेतकऱ्यांच्या योग्य नियोजनाने फलोत्पादन लागवडीतून चांगल्या आर्थिक उत्पन्नाची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार नाही. विशेष म्हणजे या फलोत्पादन प्रयोगात शेतकऱ्यांना शासनाच्या तीन योजनांअंतर्गत तीन टप्प्यात 100 टक्के अनुदान मिळणार आहे. त्यामुळे फलोत्पादन लागवडीतून शेतकऱ्यांना नफ्यासह नुकसानीची चिंता करण्याची भीती कमीच आहे.
दरम्यान भिवंडी तालुक्यात 2021 पासून ते 2026 पर्यंत आंबा लागवडीखालील क्षेत्र 744.39 हे. त्यापैकी 590 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. याप्रमाणे काजूकरिता 0.65 हेक्टर क्षेत्रापैकी 18 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम, जांभूळ फळासाठी 3.98 हे. पैकी 2 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र, चिकूसाठी 1.35 पैकी 26 हेक्टर उत्पादनक्षम, नारळ साठी 8.58 हेक्टरपैकी 40 हे. क्षेत्र हे उत्पादनक्षम आहे.
यासह मोगऱ्यासाठी 17.80 पैकी 11 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. तसेच सोनचाफ्यासाठी 5.54 हेक्टरपैकी 12 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. एकूणच 782.29 क्षेत्रापैकी 699 हेक्टर क्षेत्र हे फलोत्पादनाकरिता उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यासाठी शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना आणि एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या 3 योजनां अंतर्गत पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अशा तीन टप्प्यात 100 टक्के अनुदान मिळणार आहे.
विशेषत: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फळबाग लागवड ही शासनाची महत्वाची योजना असून शासकीय योजनांमधील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी 0.05 हेक्टर ते जास्तीत जास्त 2.0 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. दरम्यान फलोत्पादन योजनांमधील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक असून फॉर्म भरतेवेळी सात बारा, आधार कार्ड, बँक, फार्मर आयडी सोबत जोडणे गरजेचे असणार आहे.
लागवडीचे नियोजन कसे कराल?
प्रथमतः फलोत्पादन लागवडीसाठी जमीन सुपीक, खोल आणि निचरा होणारी असावी. मध्यम ते काळी जमीन फलोत्पादनासाठी उत्तम असते. बागेसाठी निवडलेली जागा पूर्णपणे मोकळी आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशी असावी. दाट सावलीच्या ठिकाणी फळझाडांची वाढ व्यवस्थित होत नाही. जमिनीत पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्या जमिनीत पाणी साचते, तिथे झाडांची मुळे कुजण्याची शक्यता असते. फळबागेस वर्षभर पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था जवळ असावी.