बदलापूरातील शाळेतील बालवाडी विभागात घडलेल्या लैंगिक अत्याचारानंतर बदलापूर शहरातील वातावरण दूषित झाले होते. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने ही शाळा बंद ठेवली होती. मंगळवारी (दि.20) शाळेविरोधात आंदोलकांनी केलेल्या आंदोलनानंतर शाळेच्या काही वर्ग खोल्यांचे नुकसान आंदोलकांनी केले होते. त्यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शाळा प्रशासन तयार नव्हते. मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या शाळा प्रशासनावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्य शासनाकडून प्रशासक नेमण्यात आला. त्यानंतर ही शाळा सुरू करावी अशी मागणी आजी-माजी विद्यार्थी व पालकांनी लावून धरली होती. दैनिक पुढारीने ही याबाबत वृत्त प्रसिद्ध करुन विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानेकडे लक्ष वेधलं होतं.
या साऱ्याची दखल घेऊन शनिवारी (दि.24) सकाळी पहिल्या सत्रात पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासक मंडळाने घेतला होता. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून शाळेपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले होते. तर विद्यार्थ्यांविना शाळेत येणारे शिक्षक, प्राध्यापक हि विद्यार्थ्यांची वाट पाहत होते.
अखेर शनिवारी (दि.24) सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी पहिल्या सत्राला सुरुवात झाली. नियमित वर्ग सुरू करण्यात आले. शनिवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उपस्थिती नेहमीपेक्षा कमी होती. कारण शाळा सुरू करण्याबाबतचे संदेश हे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना मिळाले. सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांचे उपस्थिती मोठी असेल अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. शाळा बंद असल्यामुळे व विद्यार्थ्यांमध्ये शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांमध्ये एक असुरक्षितच वातावरण होतं. मात्र आता शाळा सुरू झाल्यामुळे शहरातील जीवनमान पूर्वपदावर आल्याचे शिक्कामोर्तब झालं आहे.