ठाणे: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असे वक्तव्य करून काँग्रेसने भीतीचे राजकारण सुरू केले आहे, असा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला.
ठाणे येथे आज खरीप हंगाम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार करत म्हटले की, अशा प्रकारची भाषा ही केवळ निंदनीय नाही, तर देशाच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. ट्रम्प आणि अमेरिकेची तुलना भारताशी किंवा मोदींसारख्या जागतिक नेत्याशी करणे म्हणजे काँग्रेसच्या विचारांची दिवाळखोरी असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
शिंदे पुढे म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वाखाली देश वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे, शेतकरी सशक्त होत आहेत आणि महिलांना आत्मनिर्भरतेसह सन्मानाचे जीवन मिळत आहे.
महिला आरक्षण विधेयकासारखे ऐतिहासिक निर्णय घेण्याची हिंमत मोदी सरकारने दाखवली, तर ते विधेयक इंडि आघाडीने पाडले. भीती पसरवून राजकारण करणे ही काँग्रेसची जुनी सवय असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, 140 कोटी भारतीय जनता मोदींसोबत ठामपणे उभी आहे आणि योग्य वेळी काँग्रेसला धडा शिकवेल.