

डोंबिवली: डोंबिवलीच्या निवासी विभागात काँक्रिट रस्ते, गटार/नाले आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांच्या कामांतील तांत्रिक चुकांसह निष्काळजीपणामुळे महावितरणच्या केबल्सना त्याचा मोठा फटका बसत आहे. भयंकर उकाड्याच्या दिवसांत वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्याचा हकनाक त्रास या भागातील रहिवाशांना सोसावा लागत आहे.
या सगळ्याला कारणीभूत ठरणाऱ्या एमआयडीसी आणि त्यांच्या ठेकेदारांसह महावितरणला संतप्त रहिवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात अनेक ठिकाणी महावितरणच्या केबलमध्ये वारंवार फॉल्ट होऊन केबल जाळण्यासारखे प्रकार वारंवार होत असतात.
बहुतेक वेळा काँक्रिट रस्त्याच्या खाली आल्याने महावितरणला त्याबदली नवीन केबल रस्त्याच्या कडेने किंवा गटारातून टाकून तात्पुरत्या स्वरूपात तातडीने वीज पुरवठा चालू करून ग्राहकांना द्यावा लागत आहे. सोमवारी सकाळी वाजण्याच्या सुमारास मिलापनगर तलावाजवळ अशीच गटारावरून उघड्यावर टाकलेली केबल जळल्याने या परिसरातील रहिवाशांचा बीज सहा पुरवठा खंडित झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच महावितरणचा कर्मचाऱ्यांनी तेथे तात्पुरते जॉईंट मारून वीज पुरवठा चालू केला. हे काम पूर्ण होण्यास दुपारचे तीन वाजले होते. तोपर्यंत परिसरातील रहिवाशांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागला होता.
समन्वय साधून मार्ग काढावा महावितरणच्या ज्या केबल्स रस्त्याच्या कडेने व गटारांतून उघड्या टाकल्या आहेत. त्या रस्त्याखालून टाकण्यासाठी काँक्रीटचा रस्ता तोडावा लागणार आहे. पोटोबा हॉटेलजवळ अशीच एक जाडजूड केबल रस्त्याच्या कडेने व गटारातून जात आहे. या भागात अशा पद्धतीने टाकलेल्या केबल्सची संख्या मोठी आहे.
महावितरण, केडीएमसी, एमआयडीसी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र बसून समन्वय साधून मार्ग काढावा, जेणेकरून त्यामुळे असे वारंवार केबल फॉल्ट होऊन कोणतीही दुर्घटना होणार नाहीत. अशी मागणी या परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत असल्याचे या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.