Dahanu Tourism Pudhari
ठाणे

Dahanu Tourism: विकसित भारताच्या वाटेवर डहाणू : पर्यटनातून ग्रामीण समृद्धीकडे

शाश्वत पर्यटन, आदिवासी संस्कृती आणि स्थानिक रोजगाराच्या बळावर डहाणू तालुक्याची आशादायी वाटचाल

पुढारी वृत्तसेवा

विकसित भारत ही संकल्पना केवळ औद्योगिक प्रगती, स्मार्ट शहरे किंवा भव्य पायाभूत प्रकल्पांपुरती मर्यादित नसून पर्यावरणपूरक विकास, स्थानिक रोजगार निर्मिती, ग्रामीण भागाचा समतोल विकास आणि सांस्कृतिक वारशाचे जतन या सर्व घटकांचा समन्वय साधणारी आहे. या व्यापक दृष्टिकोनातून पाहता पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका पर्यटनाच्या माध्यमातून विकसित भारताच्या दिशेने आशादायी वाटचाल करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

विरेंद्र खाटा

डहाणू तालुक्याला चिंचणी ते बोर्डी आणि पुढे तलासरी तालुक्यातील झाईपर्यंत सुमारे 33 किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. शांत, स्वच्छ आणि तुलनेने प्रदूषणमुक्त समुद्रकिनारा, समुद्रालगत जाणारा राज्यमार्ग, नारळी व सुरुच्या बागा, चिकूच्या बागांनी वेढलेली गावे आणि मन मोहून टाकणारे सूर्यास्ताचे दृश्य. यामुळे डहाणूने पर्यटन क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शहरांच्या धावपळीच्या जीवनातून सुटका शोधणाऱ्या पर्यटकांसाठी डहाणू आज निवांत पर्यटनस्थळ ठरत आहे. ग्रीन टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम (शाश्वत पर्यटन) या विकसित भारताच्या संकल्पनांशी डहाणूचे पर्यटन पूर्णतः सुसंगत आहे.

डहाणू ते झाईपर्यंत गुजरातकडे जाणारा राज्यमार्ग समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने प्रवास करतानाच पर्यटकांना समुद्र सौंदर्य अनुभवता येते. डहाणू खाडी पुलावरून दिसणाऱ्या खाडीच्या दोन्ही किनाऱ्यांवर नांगरलेल्या बोटी, आगर येथील लँडिंग पॉईंट वरील मच्छीमारांची लगबग, चिखले बीचवरील सुरुच्या बागांमधून दिसणाऱ्या फेसाळ लाटा आणि नरपड आंबेवाडी येथे उधाणाच्या वेळी रस्त्यावर उडणारे समुद्र लाटांचे तुषार हे अनुभव पर्यटकांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवतात. त्यामुळे विकेंड आणि सुट्टीच्या काळात डहाणू, आगर, चिखले आणि बोर्डी हे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातात.

डहाणू तालुक्यातील पर्यटनाची ताकद केवळ समुद्रकिनाऱ्यापुरती मर्यादित नाही. चिकू, नारळ आणि विविध फळबागांमुळे येथील कृषी पर्यटन वेगाने विकसित होत आहे. शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या फार्म-टुरिझम केंद्रांमुळे पर्यटकांना ग्रामीण जीवनशैली, स्थानिक शेती पद्धती आणि पारंपारिक अन्नसंस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. ताजी फळे, भाजीपाला, मासे आणि घरगुती पद्धतीने बनवलेले जेवण यामुळे पर्यटकांच्या मनात सेकंड होमची भावना निर्माण होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे. शेती, पर्यटन आणि रोजगार यांचा हा समन्वय म्हणजे विकसित भारताच्या संकल्पनेचा प्रत्यक्ष आविष्कार आहे.

डहाणू हा आदिवासी बहुल तालुका असून येथील वारली चित्रकला, आदिवासी नृत्य, लोककला, पारंपारिक सण-उत्सव आणि जीवनशैली ही सांस्कृतिक पर्यटनाची मोठी ताकद आहे. पर्यटकांना येथे केवळ निसर्ग सौंदर्यच नव्हे तर स्थानिक संस्कृतीशी संवाद साधण्याची संधी मिळते. आदिवासी हस्तकला, स्थानिक उत्पादने, कला प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन दिल्यास रोजगार निर्मिती बरोबरच सांस्कृतिक जतनालाही चालना मिळू शकते. लोकल टू ग्लोबल ही विकसित भारताची संकल्पना डहाणूत प्रभावीपणे राबवता येऊ शकते.

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने डहाणू तालुका आधीपासूनच जागरूक राहिला आहे. डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात आले असून याचा थेट फायदा पर्यटन क्षेत्राला झाला आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ समुद्रकिनारे आणि जैवविविधतेने नटलेला परिसर हे आजच्या पर्यावरण-जागरूक पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन सी टर्टल या समुद्री कासवांचा वावर आढळतो, तर महिला मच्छीमार पारंपारिक पद्धतीने मासेमारी करतात. त्यामुळे कोणतीही पर्यटन योजना राबवताना पर्यावरण आणि स्थानिक संस्कृतीशी सुसंगतता राखणे आवश्यक आहे.

पायाभूत सुविधांचा विकास हा पर्यटन वृद्धीसाठी महत्त्वाचा घटक आहे. डहाणू, घोलवड आणि बोर्डी रोड ही पश्चिम रेल्वेची स्थानके, एसटी व रिक्षा सेवा, राष्ट्रीय महामार्ग, स्थानिक रस्ते आणि वाढती डिजिटल कनेक्टिव्हिटी यामुळे पर्यटकांसाठी डहाणूपर्यंत पोहोचणे सुलभ झाले आहे. डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत ऑनलाइन बुकिंग, सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी आणि डिजिटल माहितीमुळे डहाणूची ओळख देशभर पोहोचत आहे. मात्र बोर्डी येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासस्थान गेल्या काही वर्षांपासून बंद असल्याने पर्यटन विकासावर मर्यादा येत आहेत. या सुविधा पुन्हा सुरू झाल्यास स्थानिक रोजगाराला मोठा हातभार लागू शकतो.

डहाणू तालुक्यातील पर्यटनामुळे युवकांसाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. होमस्टे, हॉटेल व्यवसाय, वाहतूक, हस्तकला विक्री आणि कृषी पर्यटन केंद्रांमुळे स्थलांतर कमी होत असून युवक आपल्या गावातच स्वावलंबी बनत आहेत. घोलवड-बोर्डीच्या चिकूला भौगोलिक नामांकन मिळाल्याने प्रक्रिया उद्योग वाढीस लागले आहेत. घोलवड हे पालघर जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळखले जात असून मध उत्पादन, बांबू हस्तकला आणि स्थानिक प्रक्रिया उद्योगांमुळे पर्यटनाला पूरक रोजगार निर्माण होत आहे.

एकंदरीत पाहता, डहाणू तालुक्यातील पर्यटन हे केवळ करमणुकीपुरते मर्यादित नसून शेती, प्रक्रिया उद्योग, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक जतन आणि रोजगार निर्मिती यांचा समतोल साधणारे आहे. नियोजनबद्ध, शाश्वत आणि स्थानिकांना केंद्रस्थानी ठेवणारे पर्यटन धोरण राबविले, तर डहाणू तालुका विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणारे एक आदर्श पर्यटन केंद्र ठरू शकतो.

कसे जाणार

श्र रेल्वेने - डहाणू बीच जवळच्या डहाणू रोड रेल्वे स्टेशनपासून 8.8 कि.मी. अंतरावर आहे. पोहोचण्यास सुमारे 10 मिनिटे लागतात. त्याचप्रमाणे बोर्डी बीच जवळच्या घोलवड रेल्वे स्थानकापासून 2.8 कि.मी. अंतरावर आहे आणि बोर्डी रेल्वे स्थानक मार्गे देखील पोहोचता येते. डहाणूसाठी मुंबई व विरारहून गाड्या उपलब्ध आहेत.

श्र रस्त्याने - बोर्डी मुंबईपासून सुमारे 155 किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर रस्त्याद्वारे सुमारे 2.5 ते 3 तासांमध्ये व्यापू शकते. ठाण्याहून एनएच 3 घ्या आणि रस्त्यावर जा. वर्सोवा, मिरा-भाईंदरमधील घोडबंदर रोड ते एनएच 8 अनुसरण करा. कासामधील एनएच 8 ते डहाणू-जव्हार रोड अनुसरण करा. बोर्डीतील उंबरगाम रोडवर जाण्यापूर्वी डहाणू-जव्हार रोडवर जा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT