ठाणे: बंगाल व आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपासह एनडीएचा दणदणीत विजय झाल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांनी बँड वाजवून विजयोत्सव जल्लोषात साजरा केला. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिठाई व कोकम सरबत वाटून आनंद व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व, भाजपाची संघटनात्मक रणनीती आणि पक्षाने देशभर राबविलेल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे हा विजय झाला. बंगाल व आसाममधील जनतेने विकास, सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त केला. तसेच बंगालमध्ये नव्या पर्वाला सुरुवात केली, अशी प्रतिक्रिया जेष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी व्यक्त केली.
रेल्वे स्टेशनबाहेर झालेल्या या विजयोत्सवाला ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह माजी सरचिटणीस, मनोहर सुगदरे, विकास घांगरेकर, महिला मोर्चाच्या नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले, प्रशांत कळंबटे, श्रीकर परांजपे, संजय रानडे, राजेश ठाकरे, शरीफ शेख, हनीफ खान, मनोज शुक्ला, जगदीश मोहिते, ज्ञानेश्वर आंदुरे, सई कारुळकर, वैशाली विधाते, रंजना भंडारे, राणी क्षीरसागर, कविता यादव यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
बंगालमधील गुंडगिरी संपुष्टात - संजय केळकर
आज एक इतिहास घडला आहे. भाजपचा ऐतिहासिक महाविजय घडला आहे. ज्या ज्या ठिकाणी विरोधी पक्ष राज्य करीत होते, ते चितपट झालेले आहेत, अशा भावना व्यक्त करीत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी बंगालचा विजय हा अभूतपूर्व विजय म्हटले आहे. ते पुढे म्हणाले बंगाल,केरळ, तामिळनाडू, आसाम, पॉण्डिचारी असो, आसाम मध्ये तिसऱ्यांदा झेंडा फडकला.
ज्या पक्षाचे दोन आमदार आले होते, त्यानंतर 77 आले आणि आता पूर्ण बंगाल राज्य भाजपने ताब्यात घेतले आहे. मतदारांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि असंख्य लढवय्ये कार्यकर्त्यांनी दहशतवाद, गुंडगिरी संपुष्टात आणली आहे. ममता बॅनर्जींचे सामान्य नागरिकांना त्रास देणारे राज्य खारीज केले आहे. हा नुसता विजय नाही नार महाविजय आहे, असे म्हणता येईल, असे केळकर यांनी म्हटले आहे.