

अलिबाग: रब्बी पिकांचा हंगाम संपला आल्याने खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी करण्यास सुरवात केली आहे. गतवर्षी ऐन मे महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. सध्या सूर्य आग ओकत असला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांची लगबग सुरु झाली आहे. बांधबंदिस्ती राब जाळणे, शेतावर साचलेला पाला पाचोळा गोळा करणे, गवत काढणे आदी अनेक कामांचा वेग वाढला आहे.
भाताचे कोठार अशी पूर्वी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात भात क्षेत्र कमी झाले असले तरी त्याचे उत्पादन शेतकरी करीत आहेत. भात पिकानंतर जिल्ह्यामध्ये विविध कडधान्य पांढरा कांदा फळ पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. त्यामध्ये सर्वात जास्त भात पिकांची लागवड केली जाते. सुवर्णा, जया, कर्जत, रत्ना अशा अनेक भात पिकांची लागवड करण्यावर भर दिला जातो.
Poultry Business: रायगडातील पोल्ट्री व्यवसायावर अवकळा; नागरी आरोग्याची समस्या वाढल्याजिल्ह्यात सध्या तापमानात वाढ होत आहे. मे महिना उजाडला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. उन्हात काम करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे. आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून काही शेतकरी सकाळी सहा ते साडे सहा आणि संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतावर जाऊन मशागतीची कामे करीत आहेत.
पावसाळ्यापुर्वी ही कामे पुर्ण करण्याची लगबग सूरू झाली आहे. मात्र जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धोकादेखील असल्याने काही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पुर्ण केली आहेत. काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लागणारे भात बियाणे जमा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या जिल्हयात सुरु असलेली शेतीची कामे पंधरा दिवसांत पुर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पावसाळी भातशेतीला प्राधान्य
जिल्ह्यामध्ये 97 टक्के शेतकरी पावसावर अवलंबून भात शेती करतात. जिल्हयामध्ये सुमारे 95 हजार हेक्टर क्षेत्र भात पिकाचे आहे.20 लाखहून अधिक शेतकरी भातशेती करतात. यंदा पावसाळा सुरु होण्यासाठी एक महिना शिल्लक राहिला आहे.
पावसाळ्या पुर्वीची कामे करण्यास गेल्या अनेक दिवसांपासून सुरुवात झाली आहे. बांधावरील गवत काढणे, बांधबंदिस्ती करणे, पाला पाचोळा गोळा करून राबामध्ये टाकणे, राब जाळणे, शेतामध्ये पडलेली काटेरी झाडांच्या फांद्या गोळा करून त्यांची विल्हेवाट लावणे अशा अनेक प्रकारची कामे युध्द पातळीवर सुरु आहेत.