

अलिबागः कोरोना नंतर आरोग्याच्या बाबतीत सजग झालेल्या मनुष्यप्राणी तसेच त्याची बदलती जीवनशैली यामुळे पोल्ट्री व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. कोंबडयाच्या विष्ठेमुळे दुर्गंधी पसरणे, नागरी आरोग्याची समस्या निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री उत्पादन व्यवसाय कमी होऊ लागले आहेत. नागरिकीकरणामुळे पनवेल, उरण भागातील पोल्ट्री व्यवसाय कमी झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन यासारखे अनेक व्यवसाय शासनाकडून राबविलेले जातात. जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायही ठिकठिकाणी चालविला जात आहे. जिल्ह्यात चिकन अंडी खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या ठिकाणी प्रकल्प आले, त्या परिसरात चिकन, अंडीचा व्यवसाय तेजीत चालत आहे. जिल्ह्यातील नाक्या नाक्यावर चिकन, अंडी विक्रीचे व्यवसाय चालत आहे. बदलत्या जीवनमानामुळे पोल्ट्री उत्पादन खाण्यावर अधिक भर दिला जात आहे.
मुंबईच्या अगदी जवळ पनवेल व उरण या तालुक्यांमध्ये शहराचा विस्तार झाला आहे. त्या भागात नागरिकीकरण वाढत आहे. त्यामुळे त्या भागातील अनेक पोल्ट्री फार्म दुर्गंधीमुळे बंद करण्याची वेळ तेथील व्यावसायिकांवर आली आहे.
पनवेल, खालापूर, कर्जत, उरण या भागात जमीनीला महत्व वाढू लागले आहे. जमीन विक्रीचे व्यवहार वाढत आहेत. त्यामुळे पोल्ट्री, फार्म हाऊसच्या जागी ती जागा भाड्याने देण्यावर अधिक भर दिला जात आहे. यातून चांगले आर्थिक स्त्रोत मिळत आहे.पोल्ट्री फार्मसाठी जागा मिळणे कठीण झाले आहे. त्यात जागेचे दरही गगनाला भिडले आहेत.
480 पोल्ट्री फार्मची नोंदणी
जिल्ह्यामध्ये साधारणतः तीन हजारपेक्षा अधिक क्षमता असलेले 480 पोल्ट्री फार्मची नोंदणी आहे. त्यामध्ये अलिबाग, पाली, रोहा, कर्जत, या भागामध्ये पोल्ट्री फार्म मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यावसायातून 60 हजारहून अधिक बेरोजगारांना रोजगाराचे साधन खुले होत आहे.
पोल्ट्री व्यवसायाला गती देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत वेगवेगळ्या योजनादेखील राबवून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. चिकन, अंडी खवय्यांचा क्रेझ वाढत असला, तरी वाढत्या शहरीकरणासह नागरिकीकरणामुळे पोल्ट्री व्यवसायावर परिणाम होत असल्याची माहिती समोर आल आहे.