भाईंदर : मिरा-महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती अनिता जयवंत पाटील यांच्या दोन बंधूंनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ कुकृत्य केल्याची धक्कादायक बाब उजेडात आल्यानंतर पाटील यांच्या एका बंधूला काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा निषेध पेणकरपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व स्थानिक रहिवाशांसह काँग्रेस, शिवसेनेने ११ जून रोजी पोलिसांना निवेदन देत व पत्रकार परिषदेत पाटील यांच्या राजीनाम्याची केली आहे.
सुमारे ५ वर्षांपूर्वी पिडीताच्या तक्रारीनंतर या प्रकरणी वेळेवर पावले उचलण्यात आली नाहीत. कारण हे प्रकरण पाटील यांच्याकडून दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, असा आरोप ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ पवार यांनी केला आहे. तर पेणकर पाड्यातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार ५ जून रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात अनिता पाटील यांच्या दयाराम व राजेश चौहान या दोन बंधूंचा समावेश असून त्यातील राजेश याला काशिमीरा पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत अटक केली आहे तर दुसरा आरोपी दयाराम याचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. यातील पिडीता पालिकेच्या शाळेत शिकत असताना याच शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या दयारामने शाळेतच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्याचवेळी तिने या घटनेची माहिती अनिता पाटील यांना दिली होती. त्यावेळी पाटील यांच्या दबावतंत्रामुळे कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप पिडीताच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
यानंतर दोन्ही भावांनी पिडीतेवर सतत अत्याचार केला. या कथित लैंगिक शोषणाच्या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर यांनी ११ जून रोजी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर विरोधी पक्ष नेत्या आफरीन सय्यद मुझफ्फर हुसैन यांनी पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पाटील यांना सहआरोपी करा
या दोन्ही पक्षांनी पाटील या पालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती या जबाबदार पदावर असतानाही त्यांनी पिडीतेवर दबावतंत्राचा वापर करून तिला न्याय मिळवून न देता आपल्या दोन्ही भावांना पाठीशी घातले. त्यामुळे पाटील यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. पिडीता इयत्ता १० वी मध्ये शिकत असतानाही तिने पाटील यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली होती. त्यावेळी सुद्धा पाटील यांनी पिडीतेला मदत करण्याऐवजी त्यांनी तिच्यावर दबावतंत्राचा वापर करीत गप्प राहण्याचा सल्ला दिला.
मुख्य आरोपी दयारामच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ राजेश याने घटनेच्या व्हिडिओचा वापर करून पिडीतेला धमकावून मानसिक त्रास दिल्याचा आरोप शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक निशा नार्वेकर यांनी केला आहे. तर काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या आफरीन यांनी घटनेची नैतिक जबाबदारी पाटील यांनी स्विकारावी आणि राजीनामा द्यावा असे म्हटले.