Bhatsa Dam Water Level Pudhari
ठाणे

Bhatsa Dam Water Level: भातसा धरणाची जलसाठ्यात 'हाफसेंच्युरी'

तानसा-मोडकसागर ७० टक्क्यांच्या उंबरठ्यावर; चिंता मिटली

पुढारी वृत्तसेवा

राजेश जागरे

शहापूर: शहापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात विशेषतः भातसा धरणाने जलसाठ्याची 'हाफसेंच्युरी' गाठत ५०.९८ टक्क्यांचा टप्पा पार केला असून, तानसा ६९.३५ आणि मोडकसागर ७२.१४ टक्के भरल्याने आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई महानगराला सर्वाधिक म्हणजे सुमारे ७० टक्के पाणीपुरवठा भातसा धरणातून केला जातो. भातसा धरणाची एकूण संकल्पित साठवण क्षमता ९४२.१० दशलक्ष घनमीटर आहे.

सातत्याने होत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात ४८०.२६४ दशलक्ष घनमीटरने वाढ झाली असून जलसाठ्याने ५० टक्क्यांवरील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबतचे चित्र अधिक आशादायी बनले आहे.

तानसा धरणाची संकल्पित साठवण क्षमता १४५.०८ दशलक्ष घनमीटर, तर वैतरणा प्रणालीतील मोडकसागर धरणाची क्षमता १२८.९३ दशलक्ष घनमीटर आहे. या दोन्ही धरणांमध्येही जलसाठा सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने मुंबईच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे. भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही चांगला पाऊस सुरू असून, नद्यांना पूर आला आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने धरणांतील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पाणीकपातीची शक्यता कमी झाल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

मुंबईसह ठाणे आणि उपनगरांच्या दृष्टीने भातसा, तानसा आणि मोडकसागर ही धरणे जीवनवाहिनी मानली जातात. जुलैच्या सुरुवातीलाच या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा निर्माण झाल्याने नागरिकांसह प्रशासनालाही मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT