दुर्गावती नगरी बीड pudhari photo
ठाणे

Beed historical origin : दुर्गावती नगरी बीड

पुढारी वृत्तसेवा

नीती मेहेंदळे

मराठवाडा विभागातील जिल्हे प्राचीन शिल्पकला व स्थापत्यांनी समृद्ध आहेत. प्रसिद्ध शहरं तर आहेतच पण अगदी लहानसहान गावांवरून जाताना तिथल्या स्थापत्यांचे नमुने त्यांच्या प्राचीनत्वाची ग्वाही देतात. बीड जिल्हा असाच एक शिल्पदृष्टीतून अतिसमृद्ध जिल्हा. स्वतः त्याचं नावाचं गावही आहे. बीडचा प्रारंभिक इतिहास अज्ञात असून त्याच्या स्थापनेबद्दल आणि सुरुवातीच्या इतिहासाबद्दल ऐतिहासिक वृत्तांतांमध्ये विरोधाभास आढळतात. बीडसंदर्भात अनेक आख्यायिका रुढ आहेत.

पौराणिक कथेनुसार, जेव्हा लंकेचा राजा रावण सीतेचं अपहरण करून तिला लंकेला घेऊन जात होता, तेव्हा जटायूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. रावणाने त्याचे पंख कापले व जटायू जखमी होऊन जमिनीवर पडला. जेथे त्याचा मृत्यू झाला ते ठिकाण बीड शहरात असल्याचं मानलं जातं. तेथे आज जटाशंकर मंदिर आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर देवगिरीच्या यादवांनी बांधले असावे असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. तथापि, भारतातील इतर भागात जटाशंकर मंदिरे मुबलक प्रमाणात आहेत. त्यांसंबंधी त्याच कथा आहेत. पण या सगळ्यांच्या मुळाशी श्रद्धा आहे.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, महाभारतात बीड हे दुर्गावती म्हणून वसलेले ठिकाण होते. नंतर त्याचे नाव बदलून बालणी असे ठेवण्यात आले. विक्रमादित्याची बहीण चंपावतीने ताब्यात घेतल्यावर त्याचं नाव चंपावतीनगर ठेवलं होतं, असं मानतात. त्यानंतर हे शहर चालुक्य, राष्ट्रकूट व यादव राजवंशांच्या अधिपत्याखाली होतं. काही विद्वानांचं मत आहे की ते कदाचित देवगिरीच्या यादव शासकांनी (1173-1317) वसवलं असावं.

पुढे मध्य युगात ते एक महत्त्वाचं शहर होतं याचे मात्र पुरावे आहेत. तारिख-ए-बीर (बीडचा इतिहास) असा उल्लेख आहे की, मुहम्मद बिन तुघलकने शहरात एक किल्ला आणि आजूबाजूला तटबंदी, शिवाय अनेक विहिरी बांधल्यानंतर त्याचे नाव बीर असं ठेवलं. जुना किल्ला आता अस्तित्वात नाही. विहिरींचा नमुना म्हणून खजाना बावडी मात्र शहरात आहे. या शहरात भूजल मुबलक होतं आणि जेव्हा विहिरी बांधल्या गेल्या तेव्हा काही फूट खाली सुद्धा पाणी आढळत असे. अगदी अलिकडच्या काळापर्यंत, शहरात विहिरी मुबलक होत्या.

आधुनिक पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेमुळे त्यांचे महत्त्व कमी झाले. हे बीड, बेंडसुरा किंवा बिंदुसरा नदीच्या काठावर वसलं आहे. बिंदुसरा ही गोदावरी नदीची उपनदी असून बीडच्या नैर्ऋत्येस सुमारे 30 किमी अंतरावर वाघिरा गावाजवळ बालाघाट पर्वतरांगांच्या टेकड्यांमध्ये उगम पावते. ही नदी शहराला लहान पूर्व आणि मोठ्या पश्चिम भागात विभागते.

तुघलक साम्राज्याच्या राज्यपालांपैकी एक जुन्ना खान बराच काळ बीडमध्ये राहिला होता. त्याने शहराभोवती संरक्षण भिंत बांधून बिंदुसराचा मार्ग पश्चिमेकडून पूर्वेकडे वळवला. त्याच्या काळापूर्वी शहरासाठी असे कोणतेही संरक्षण नव्हते आणि ते नदीच्या पूर्वेकडील तीरावर वसलेले होते. त्यानंतर लोकसंख्या मोठ्या प्रमाणात पश्चिमेकडील भागात स्थलांतरित झाली.

बीड शहरात फेरफटका मारताना अनेक जुनी देवालयं, वाडे आणि मुख्य वेशी नजरेस पडतात. गाव पूर्वी तटबंदीयुक्त असावे कारण तिचे अवशेष दिसतात. गावातली बरीचशी मंदिरं त्यांवरच्या शिल्पकलेवरून आणि बांधणीवरून मराठा कालखंडात जीर्णोद्धार झालेली दिसतात. सर्वात जुनं मानलं जाणारं म्हणजे कंकालेश्वर. बीड शहर, तुघलक साम्राज्याचा भाग होईपर्यंत त्याचा प्रारंभिक इतिहास अस्पष्ट आहे. जर हे शहर यादव काळात वसलं असेल तर कदाचित ते राजा सिंघनाच्या (इ.स. 1210-47) काळात घडलं असेल, जेव्हा यादव राजवंश त्याच्या उत्कर्षावर होता.

सिंघनाने कंकालेश्वर मंदिर बांधलं असावं आणि त्याच्याभोवती एक लहान शहर बांधलं असावं. अर्थात मंदिराचं शिखर पडून गेलं असल्याने त्याची शैली व काळ सांगणं अवघड आहे. शहरातील तीन मध्ययुगीन मंदिरांपैकी, जटाशंकर, पापनेश्वर आणि कंकालेश्वर मंदिर, पहिल्या दोन मंदिरांचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार केला आहे, ज्यामुळे त्यांच्या प्राचीनतेचे कोणतेही अवशेष शिल्लक राहिले नाहीत. कंकालेश्वर मंदिराचेही जीर्णोद्धार करण्यात आले आहे, तथापि, त्याचा पाया आणि भिंती मूळ आहेत.

मंदिर पश्चिमेकडे तोंड करून आहे. ते पाण्याच्या साठ्याच्या मध्यभागी उंचीवर बांधले आहे. साडेपाच फूट लांब आणि 6 फूट रुंदीचा दगडी मार्ग मंदिराला पाण्याच्या टाकीशी जोडतो. मंदिर 4 फूट उंचवर उभे आहे आणि सभोवती प्रदक्षिणा पथ आहे. मंदिराचे विधान तारकाकृती आहे. जगतीपर्यंत पोहोचण्यासाठी जोडणाऱ्या वाटेने गेल्यावर पायऱ्यांचा वापर करता येतो. पायऱ्यांच्या पायथ्याशी दोन कोनाडे आहेत, ते सध्या रिकामे आहेत.

मंदिर त्रिदल प्रकारचे असून मंदिरात एक मुखमंडप, एक मंडप, तीन अंतराळ व तीन गर्भगृहे आहेत, जी एका सामान्य मंडपाला वेगवेगळ्या अंतराळांद्वारे जोडलेली आहेत. हा मंडप पूर्वेला एका मुखमंडपाला जोडलेला आहे. मुखमंडपाला त्याच्या छताला आधार देणारे चार खांब आहेत. मंडप अष्टकोनी आहे, ज्याच्या बाजूंना चोवीस खांब आहेत. मंदिराचं मुख्य गर्भगृह पश्चिमेला आहे व ते मुख्य देवतेचे आहे. इतर दोन गाभारे उत्तर व दक्षिण दिशांना उपदेवतांसाठी आहेत. त्याची द्वारशाखा पंचशाखा प्रकारची म्हणजे नंदिनी आहे, जी पूर्णकलश, पदक, कमळ, कीर्तिमुख आणि लघुस्तंभांनी सजलेली आहे.

सध्या ललाट बिंबावर गणेशशिल्प आहे. शैव द्वारपाल हे जांबांवर आहेत. कमानीवर एक तोरण कोरलेले आहे. तोरणाच्या पुढे विविध कोनाडे आहेत, ज्यात फुलांच्या आकृत्यांनी सजवलेले आहेत. जरी सर्व गर्भगृहे आणि अंतराल यात बरंच साम्य असलं तरी इतर गाभाऱ्यांचे दरवाजे साध्या अलंकारांनी कमी सजवलेले आहेत.अधिष्ठानात अनेक थर असून त्यात पुष्प, नंतर क्षिप्त पट्टा, मग कीर्तिमुख पट्टा व चौथा कमलपुष्प पट्टा दिसतो. याच्या वरच्या पट्ट्यात योद्धे, गायक -वादक, शिकारी शिल्पं असून त्यावर ब्रह्मा, सावित्री, पार्वती, नटेश, शिवतांडव, अंधकासूर वधमूर्ती, भैरव, वराह, नृसिंह या 15 देवकोष्ठांमध्ये आहेत.

मंदिरात कोणताही शिलालेख सापडलेला नाही.गावाच्या उत्तरेला टेकडीवर खंडोबा मंदिर आहे. या मंदिरावर कोणताही शिलालेख नाही, परंतु मंदिराच्या शैलीवरून ते मराठा काळातलं बांधकाम असल्याचं समजतं. मंडपावर भव्य शिखर आहे. छताच्या कोपऱ्यांवर होळकरकालीन मंदिरांवर असतात तशा घुमटीसारख्या छत्र्या आहेत. मंदिराच्या पूर्वेस दोन दीपमाळांसारखे उंच मनोरे आहेत, जे या मंदिराची खूण आहेत. या मनोऱ्यांची उंची 45 फूट असून ते अष्टकोनी आकाराचे आहेत आणि त्यांचे तळ चौरसाकृती आहेत.

प्रत्येक मनोऱ्याच्या आत वर जायला एक अरुंद जिना आहे. या पाच मजली उंच मनोऱ्यांच्या प्रत्येक मजल्यावर कमानीदार उघड्या खिडक्या आहेत. बाहेरच्या भिंतींवर होळकरकालीन शिल्पं आहेत.बीडच्या पूर्वेस टेकडीवर खंडोबा मंदिराजवळ खांडेश्वरी देवीचं मंदिर आहे. नवरात्रात परिसरात मोठी यात्रा भरते. मंदिर दक्षिणाभिमुख असून प्राचीन आहे. इथे सभामंडप व गर्भगृह अशी रचना असून गाभाऱ्यात एका चौथऱ्यावर शेंदूर लावलेला देवीचा तांदळा आहे. या मंदिरासमोर काळोबा वीर धनगराची समाधी आहे. मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला आहे. गावात जटाशंकर मंदिर, रामेश्वर, पापनेश्वर, बेलेश्वर, कालिंदेश्वर, निळकंठेश्वर अशी मराठा काळात जीर्णोद्धार झालेली मंदिरं आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT