वृक्षवल्ली आम्हां...

spiritual peace among trees
वृक्षवल्ली आम्हां...pudhari photo
Published on
Updated on

डॉ. महेश केळुसकर

ध्यानसाधनेसाठी आणि शांतीचा अनुभव घेण्यासाठी वृक्षांच्या मध्ये बसणं महत्त्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला आपण कोण आहोत, आपले ध्येय काय आहे, म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, तर वनाच्या सान्निध्यात येऊन भजन-कीर्तन करावं. मनाचा मनाशी संवाद साधण्यासाठी, स्वतःचं चिंतन करण्यासाठीही वनएकांत हीच योग्य जागा आहे.

या आठवड्यात 4 डिसेंबरला परळच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये सत्यशोधक मनोहर कदम यांचा 25 वा स्मृती जागर अतिशय जिव्हाळ्याने करण्यात आला. गेली 50 वर्षे स्त्री मुक्ती चळवळीचे कार्य करणाऱ्या ज्योती म्हापसेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. आणि प्रमुख पाहुणे म्हणून हास्यजत्राचे लेखक- दिग्दर्शक सचिन गोस्वामी मंचावर होते. परिवर्तनाच्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड सुबोध मोरे आणि साथी रमेश हरळकर यांचा ज्योतीताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

spiritual peace among trees
माऊली

याप्रसंगी सचिन गोस्वामी यांच्या मनोगतातील एक मुद्दा लक्षवेधी ठरला. ते म्हणाले की, नाशिक येथे होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधूंसाठी जी वृक्षतोड होणार आहे, त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे आपल्याला एका हिंदुत्ववादी मित्राचा फोन आला आणि तुम्ही कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमाबाबत ढवळाढवळ केली, तर उद्ध्वस्त होऊन जाल अशी त्याने धमकी दिली. गोस्वामी पुढे म्हणाले, “माझ्या उद्ध्वस्तपणाची मला काळजी नाही, पण आपण जर या ना त्या कारणाने अशीच झाडं तोडत राहिलो, तर उद्या ना परवा आपण सगळेच उद्ध्वस्त होऊ.” गोस्वामींचं म्हणणं खरं आहे.

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे तर झाडं वाचवण्यासाठी आपण प्राणसुद्धा देऊ असं जाहीर करून बसलेत. लेखक आणि कलावंत वृक्षवल्लीच्या संरक्षणासाठी आता पुढे येऊ लागलेत ही एक चांगली गोष्ट आहे. त्यांचा कुंभमेळ्याला विरोध नाहीये. पण, काही अचानक हिंदुत्ववादी झालेली पुढारी मंडळी या लेखक आणि कलावंतांना छळण्यासाठी, त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यासाठी पुढे सरसावलीत, ही वाईट गोष्ट आहे. त्या पुढाऱ्यांना माहीत नाही की, हिंदू संस्कृती ही झाडांची पूजा करणारी आहे, झाडं तोडणारी नाही.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी रचलेला वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरें हा अभंग केवळ एक काव्यपंक्ती नसून, तो भारतीय पर्यावरणीय नीतीचा केंद्रबिंदू आहे. ही ओळ निसर्ग आणि मानवाच्या संबंधांना एका नव्या, गहन पातळीवर नेते. सोयरे या शब्दाचा अर्थ केवळ मित्र किंवा शेजारी नसून, ते कुटुंबाचे अविभाज्य सदस्य, नातेवाईक आहेत. या संकल्पनेतून तुकाराम महाराजांनी मानवी जीवनातील निसर्गाचं महत्त्व अनेक शतकांपूर्वीच अधोरेखित केलं.

spiritual peace among trees
Thane public WiFi service : ठाण्यातील शाळा, रुग्णालये, रेल्वेस्थानक, मेट्रोच्या स्थानकांमध्ये वायफायची सुविधा

आज, जेव्हा जागतिक स्तरावर हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांचं शोषण यांसारखी संकटं उभी आहेत, तेव्हा या आध्यात्मिक नात्याची व्यावहारिक अनिवार्यता अधिक स्पष्ट होते. उदाहरणार्थ, अलीकडील जागतिक आरोग्य संकटाच्या काळात ऑक्सिजनचं महत्त्व निर्विवादपणे सिद्ध झालं. ज्या प्राणवायूशिवाय मानव काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही, तो पुरवणारे वृक्ष हे खऱ्या अर्थानं सोयरे (आधारस्तंभ) आहेत.

संत तुकारामांनी सोयरे या शब्दाचा वापर करून निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंधांना नैतिक जबाबदारीच्या चौकटीत बसवलं आहे. कुटुंबाच्या सदस्यासोबत जसा जन्मजात ऋणानुबंध असतो, तसाच ऋणानुबंध निसर्गाशी ठेवण्याची नैतिक जबाबदारी यातून सिद्ध होते. या नात्यातून केवळ निसर्गाकडून भौतिक गोष्टी घेणं अपेक्षित नाही, तर त्याचं देणं आणि संगोपन करणं हे अनिवार्य ठरतं. जेव्हा वृक्ष, वेली आणि वनचर यांना सोयरा मानलं जातं, तेव्हा शोषणावर आंतरिक व नैतिक मर्यादा येतात. या नात्यातून निर्माण होणारी नैतिक चौकट पर्यावरण संवर्धनाला मानवाचं अनिवार्य कर्तव्य बनवतं.

ध्यानसाधनेसाठी व शांतीचा अनुभवासाठी वृक्षांमध्ये बसणं महत्त्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला आपण कोण आहोत, आपले ध्येय काय आहे, म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल, तर वनाच्या सान्निध्यात येऊन भजन-कीर्तन करावं. मनाचा मनाशी संवाद साधण्यासाठी, चिंतन करण्यासाठीही वनएकांत हीच योग्य जागा आहे. आयुष्य अधिक सुंदर, समाधानानं जगायचं असेल, तर वृक्षांच्या सान्निध्यातच एकमेव योग्य जागा असल्याचं तुकाराम महाराज स्पष्ट करतात.

तुकारामांनी वृक्ष, पशु, पक्षी यांना सगे सोयरे मानून, त्यांच्या सोबतचा एकांत प्रिय मानला. त्यांच्या अभंगातून निसर्ग संवेदनेचा जागर होतो आणि नैतिक बोधही मिळतो. संत साहित्यातील हे निसर्गसंवेदन परमार्थाच्या विचारातून व्यक्त झालं आहे, ज्याला भारतीय संस्कृतीतील पंचमहाभूतांना परमेश्वर स्वरूप मानण्याच्या तत्त्वज्ञानाचा आधार आहे. या तत्त्वज्ञानानुसार, आकाश मंडप आणि पृथ्वी आसन आहे, जिथे तुकारामांचं मन रमतं. मानवी आध्यात्मिक आरोग्य नैसर्गिक पर्यावरणाच्या अखंडतेवर अवलंबून आहे.

आत्मज्ञान किंवा मनःशांती सिमेंटच्या जंगलात प्राप्त होऊ शकत नाही. आंतरिक शांततेसाठी निसर्गाचं सान्निध्य आवश्यक असेल, तर निसर्गाचा ऱ्हास थेट मानवी मन आणि आत्म्याला हानी पोहोचवतो. त्यामुळे, पर्यावरण संवर्धन हे केवळ भौतिक जग वाचवणं नसून, ते मानवाचं आंतरिक जग सुरक्षित ठेवणं आहे. पर्यावरणाचा नाश करणं म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक व मानसिक आरोग्याचा स्रोत नष्ट करण्यासारखं आहे. संत तुकारामांच्या विचारांचं मूळ भारतीय ज्ञान परंपरेत आहे, जिथे निसर्गाला भौतिक वस्तू म्हणून नव्हे, तर दैवीशक्ती म्हणून पाहिलं जातं.

भारतीय तत्त्वज्ञानानुसार, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आणि आकाश ही पंचमहाभूते विश्वनिर्मितीचे कारण मानली जातात. याच कारणामुळे सूर्य, धरित्री आणि इतर नैसर्गिक घटकांना परमेश्वर स्वरूप मानण्याची परंपरा आहे. अथर्ववेदातील सूत्र माता भूमि पुत्रोहं पृथिव्या: हे स्पष्टपणे सिद्ध करते. हे सूत्र मानवाला निसर्गावर वर्चस्व गाजवण्याचा नव्हे, तर त्याच्या पालनपोषणाचा अधिकार देतं. समर्थ रामदासही दासबोधात पंचमहाभूतांच्या अस्तित्त्वामुळेच जग निर्माण झालं आहे, असं स्पष्ट करतात:

पंचभूते झाले जग | पंचभूतांची लगबग | पंचभूते गेलियां मग | काय आहे.

समर्थ रामदासांच्या दासबोधात निसर्गाच्या वैविध्याचं सुंदर वर्णन आढळतं. वृक्षवल्लींमध्ये जीवन, नाना फळे, फुले, कंदमुळे आणि गुणकारी औषधी आहेत. पृथ्वी किती बहुविध रत्नांची खाण आहे व येथील जीवसृष्टी किती वैविध्यपूर्ण आहे, याचं विवेचन दासबोधात केलं आहे. यावरून स्पष्ट होतं की, भारतीय ज्ञान परंपरेत निसर्गाला केवळ आधार नव्हे, तर विस्मयकारक निर्मिती म्हणून आदर दिला गेला आहे.

spiritual peace among trees
Highway to civic body transition : घोडबंदर रोडनंतर आता राष्ट्रीय महामार्ग पालिकेकडे हस्तांतर होणार?

पंचमहाभूतांना परमेश्वर मानण्याचं प्राचीन तत्त्वज्ञान हे आधुनिक सरकारी उपक्रम माझी वसुंधरा यांचा मूलभूत आधार आहे. ही सांस्कृतिक नीती पर्यावरणीय धोरणांच्या अंमलबजावणीसाठी व लोकांकडून स्वीकारार्हतेसाठी महत्त्वाची ठरते. केवळ वैज्ञानिक तथ्ये, जसे की कार्बन उत्सर्जन कमी करणे, लोकांना कृती करण्यास भाग पाडत नाहीत. परंतु, जेव्हा संवर्धनाचं कार्य धर्म, कर्तव्य/ पूजा म्हणून पाहिलं जातं, तेव्हा लोकसहभाग वाढतो.

महाराष्ट्रातील ‌‘माझी वसुंधरा‌’ अभियानानं पंचतत्त्वांचा आधार घेऊन संवर्धनाला सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांशी जोडणी साधली आहे, ज्यामुळे शाश्वत विकासाचे ध्येय गाठता येतं. हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांनी जंगल संपत्तीचे महत्त्व ओळखून गड तेथे आमराई, गाव तेथे वनराई हा नारा आपल्या आज्ञापत्रातून दिला होता. या धोरणातून त्यांचा पर्यावरणविषयी उदात्त हेतू स्पष्ट दिसून येतो, ज्यामुळे त्या काळातही जंगल संवर्धनाला संस्थात्मक आधार मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news