भाईंदर : अॅप आधारीत टॅक्सी, रिक्षा व ई-बाईकसाठी अॅग्रिगेटेड धोरण नियमावली येत्या 2 दिवसात जाहीर होत असून त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात अॅप आधारीत टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणार्या संस्थांनी व्यवसाय करताना प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
ते मंत्रालयात मंगळवारी आयोजित इंडियन फेडरेशन ऑफ अॅप बेस ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या (आयएफएटी) बैठकीत बोलत होते. भरमसाठ नफा कमविण्याच्या प्रयत्नात प्रवाशांची आर्थिक लुबाडणूक करून व्यवसाय वृद्धी करू नये, असे आवाहन सरनाईक यांनी अॅप आधारीत टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणार्या संस्थांना केले आहे.
प्रवासी व चालकांकडून या संस्थांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून यापैकी काही संस्था नफेखोरीच्या नादात प्रवासी व चालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचे वेळोवेळी उघड झाल्याचे त्यांनी सांगितले. हे रोखण्यासाठी निश्चित नियमावली तयार करून वाजवी भाडे आकारणे तसेच चालकांना मिळणार्या उत्पन्नातील 80 टक्के परतावा त्यांना देणे, अशा महत्त्वाच्या सुधारणांचा समावेश असलेले अॅग्रिगेटेड धोरण येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
या धोरणामुळे अॅप आधारीत टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी चालवणार्या संस्थांवर थेट राज्य शासनाचा अंकुश राहणार असल्याने प्रवाशांना आणि या संस्थेकडे काम करणार्या चालकांना न्याय मिळेल, असा दावा त्यांनी केला.
व्यवसायाला निश्चित दिशा प्राप्त होईल
राज्यातील बेरोजगार तरुण, तरुणींना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याच्या हेतूने अॅग्रिगेटेड धोरणाच्या माध्यमातून अॅप आधारीत टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा एकाच नियमावलीच्या छताखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यामुळे या व्यवसायाला निश्चित अशी दिशा प्राप्त होईल. त्यातून प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यासोबतच चालकांच्या हक्काचे व अधिकाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव किरण होळकर, आयएफएटीचे अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.