डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावर असलेल्या आंबिवली स्टेशन जवळील पाटील नगर परिसरात रात्रीच्या सुमारास घरांवर पेटलेले सुतळी बॉम्ब फेकले जात असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात रहिवाशांनी खडकपाडा पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र बॉम्ब फेकणाऱ्या अज्ञात इसमांवर कारवाई केली जात नसल्याने रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.
कल्याण-डोंबिवलीत नशोखोरांनी हैदोस मांडला असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शिवीगाळ, मारहाण, हल्ल्यांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असतानाच कल्याणनजीकच्या आंबिवलीतील पाटील नगर वस्तीतील रहिवासी प्रचंड त्रासले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागातील रहिवाशांच्या घरांवर रात्रीच्या सुमारास पेटलेले सुतळी बाम्ब फेकले जातात. बॉम्ब फुटल्यानंतर होणाऱ्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे लहान मुलांसह वयोवृद्धांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक रहिवासी सतीश यादव यांनी यासंदर्भात वारंवार खडकपाडा पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र कारवाई करू, असे पोलिसांकडून सांगण्यात येते. पण कारवाई केली जात नसल्याने रहिवाशांच्या चिंतेत भर पडली आहे.
या परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रकरणामुळे रहिवासी एकवटले होते. खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तक्रार करण्यास सांगितले. परंतु पुढे काही झाले नाही. या परिसरात नशेखोरांचा वावर आहे. नशेखोरांच्या उपद्य्वापांना स्थानिक रहिवासी विरोध करतात. त्यामुळेच नशिल्या पदार्थांची विक्री करणारे बदमाश आणि नशेखोर विरोध करणाऱ्यांच्या घरांना टार्गेट करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या संदर्भात पोलिसांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. पोलिसांनी या प्रकरणात गंभीर दखल घेऊन भयग्रस्त रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.