अंबरनाथ : अंबरनाथ मध्ये शिवसेना-भाजपाची युती झाली असली तरी एकमेकांमधील राजकीय चढाओढ काही संपलेली नाही. हीच चढाओढ नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या विविध विकास कामांच्या टेंडरमध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांचा आदेश झुगारून अंबरनाथचे राजकारण टेंडर भोवती फिरताना दिसत आहे. या राजकीय स्पर्धेतून तब्बल ४५ टक्के कमी दराच्या निविदा भरल्याने याचा मोठा परिणाम विकास कामांवर होणार आहे.
कोरोना काळामुळे मागील पाच वर्षे निवडणुका झाल्या नाहीत. त्यांनतर डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा प्रथमच एकमेकांच्या विरोधात निवडणुक लढली. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शिवसेनेच्या मनीषा वाळेकर यांचा भाजपाच्या तेजश्री करंजुले यांनी दारुण पराभव केला.
पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या वाळेकर कुटुंबीयांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाची युती झाली असली तरी वाळेकर आणि करंजुले यांच्यातील मतभेद आजही कायम आहेत. याच मतभेदातून टेंडर मधील राजकारण देखील समोर आले आणि स्पर्धा करण्याच्या नादात तब्बल ४५ टक्के कमी दाराच्या निविदा भरल्या गेल्या. त्यामुळे आता टेंडर जरी ज्याला लागले आहे, तो कामाचा दर्जा कसा राखणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मागील महिन्यात ४० कोटी रूपयांच्या ३९ विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र राजकीय स्पर्धेतून ३५ ते ४५ टक्के कमी दराच्या निविदा भरल्या गेल्याचे समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता ज्यांना या कामाच्या निविदा लागल्या आहेत. ते आपले काम कसे पूर्ण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.