29 panels of 4 members each for the selection of 122 KDMC members
कल्याण : सतीश तांबे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे आदेश निवडणूक आयोगाने घोषित केल्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप कामाला वेग आला आहे.
महापालिका क्षेत्रात २०११च्या लोकसंख्येनुसार २०१५ साली पार पडलेल्या पालिका निवडणुकीत आलेल्या १२२ प्रभागाची संख्या इतकीच प्रभागाची संख्या यंदाच्या पालिका निवडणुकीत जैसे थे ठेवण्यात आली आहे. पालिका क्षेत्रातील व २७ गावातील प्रभागासाठी चार सदस्यीय प्रभाग (पॅनल) पद्धतीने निवडणूक घेतली जाणार असल्याने एक प्रभाग ५० हजार मतदारांचा असणार असल्यामुळे १२२ सदस्य निवडीसाठी चार सदस्याचे २९ पॅनल तर ३ सदस्य निवडीसाठी २ प्रभाग (पॅनल) अशा ३१ प्रभागाची (पॅनल) रचना करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्रभाग रचना केल्यानंतर आता प्रभागांच्या सीमारेषा निश्चित करण्याच्या कामाला सुरुवात केल्याने प्रभागाची फोड कश्या पद्धतीने केली जाणार ती आपल्याला फायद्याची असणार की नुकसानीची असणार यासाठी राजकीय पक्षांसह इच्छुकांनी धावपळ करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे प्रभाग रचनेची सुरुवात प्रभाग उत्तरेकडून केली जात असल्याने टिटवाळा प्रभागातून सुरुवात करावी की उंबर्डे प्रभागातून सुरुवात करावी असा यक्ष प्रश्न पालिकेच्या निवडणूक विभागाला पडला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेची २०११ च्या जनगणनेनुसार १८ लाख लोकसंख्या गृहीत धरून २०१५ च्या २७गावासह निवडणुका घेण्यात आल्या होत्या. २०१५ साली पार पडलेल्या पालिका निवडणुकीत सर्वाधिक शिवसेना ५३ तर भाजपा ४३ जागेवर निवडून आल्या होत्या. त्या खालोखाल मनसेने ९, काँग्रेस ४, राष्ट्रवादी काँग्रेस २, एमआयएम व बसपा प्रत्येकी एक एक तर अपक्ष ९ जागांवर असे एकूण १२२ नगरसेवक आले होते. १९९५ साला पासून २०१५ सालाच्या पाच पालिका निवडणुक केवळ २००५ साली पार पडलेल्या निवडणुकीत अडीज वर्ष शिवसेनेच्या वर्चस्व खंडित करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालिकेवर सत्ता मिळविली होती.
त्यानंतर सेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र शिवसेना पक्षाच्या पक्ष फुटीनंतर शिवसेनेत दोन गट पडल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यातच कल्याण डोंबिवली महापालिकेत १९९५ पासून सुरू झालेल्या निवडणुकीत कायमच एक प्रभाग निवडणूक झाल्याने आगामी होऊ घातलेल्या पालिका निवडणुका पॅनल पद्धतीने घेतली जाणार आहे. लोकप्रतिनिधी, मतदारही पॅनल पद्धतीच्या निवडणुकीस सामोरे जाणार असून पॅनल पद्धतीच्या निवडणुकीची सवय नसल्याने लोकप्रतिनिधींनी धास्ती घेतली आहे.
तर दुसरीकडे प्रशासनही प्रथमच पॅनल पद्धतीची आखणी करत असल्याने सीमारेषा निश्चित करताना कर्मचाऱ्यांची कसरत सुरू आहे. २०२२ साली निवडणूक आयोगाच्या आदेशाने केडीएमसी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यासाठी प्रभाग प्रारूप रचना आराखडा जाहीर करीत १२२ प्रभागाचे सीमांकन करून त्रिसदस्यीय पॅनल पाडण्यात आले होते. त्यावेळीही प्रभागाची फोड करताना पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्याची तारांबळ उडाली होती. आता पुन्हा १२२ प्रभागांमध्ये ४ प्रभागाचा १ प्रभाग अशी फोड करावी लागणार असून कोणते प्रभाग एकमेकांना जोडून पॅनल तयार केले जाणार व त्या प्रभागाच्या सीमांकन रचना आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली असल्याने याकडे सर्वच राजकीय पक्ष व नव्याने निवडणुकीत उभे राहणाऱ्या इच्छुकाना उत्कंठा लागली असून काही त्यांनी प्रभाग रचनेसाठी धावपळ सुरू केली आहे.
चार सदस्यीय पॅनलमध्ये उमेदवारांना केवळ आपल्या प्रभागातील नव्हे तर संपूर्ण पॅनल म्हणजेच चारही उमेदवारांच्या मतदार संघातील मतदारांची मते मिळवावी लागणार असल्याने आपल्या प्रभागासह आजूबाजूच्या प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांची कामे करण्याची सुरुवात निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या इच्छुकांनी केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २०११ च्या लोकसंख्येनुसार ४९ ते ५० हजार मतदारांचा एक प्रभाग असे २९ प्रभाग चार सदस्यांचा पॅनल असलेले तर उर्वरित २ प्रभाग ४० ते ४५ हजार मतदारांचे तीन सदस्यांचा पॅनल अशा ३१ प्रभागाची (पॅनल) रचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. २७ गावाचा विषय न्यायालयात प्रलंबित असला तरी आताची प्रभाग रचना गावासह करण्यात आली आहे.