सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : एकमेकांवर चार वाहने धडकल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तीन ते चार जण जखमी झाले. दरम्यान मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. सोलापूर- पुणे महामार्गावरील बाळे ब्रीजवर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीजवळ कंटेनर थांबला होता. त्याला पाठीमागून ट्रक, कार आणि दुचाकीने धडक दिली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले. यात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे दाखल झाले. पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी पॉईंटमुळेच अपघात झाल्याचा आरोप करत आक्रमक शिवसैनिकांनी सोलापूर- पुणे महामार्ग काही वेळसाठी रोखून धरला. शिवसैनिकांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे सोलापूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
पोलीस उपायुक्त विजय कबाडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्याशी चर्चा करून नाकाबंदी पॉईंट दुसरीकडे हलवून दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला. मृतदेह आणि जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी बाळे येथे नाकाबंदी केली होती. मात्र, पोलीस चुकीच्या पद्धतीने वाहने अडवतात, यामुळे आज एका कुटुंबाचा बळी गेल्याचा आरोप शिवसेनेचे अमोल शिंदे यांनी केला. या प्रकाराची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे.
हेही वाचा