वैराग, पुढारी वृत्तसेवा : मुंगशी येथील नागझरी नदीपात्राकाठी विद्युत तार तुटल्याने नदीपरिसरात चरत असलेल्या तीन म्हशींना विद्युत झटका लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.1) दुपारी मुंगशी शिवारात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंगशी येथील शेतकरी जयकुमार अर्जुन कोरे हे त्यांच्या शेतीपरिसरात पत्नी आणि मुलासोबत आपल्या शेतात सोयाबीन काढत होते. यावेळी त्यांनी नदीच्या काठाला म्हैशी चरण्यासाठी सोडल्या होत्या.
यावेळी चरत असताना नदी काठाला तुटलेली तार असल्याने त्यात विद्युत प्रवाह चालू होता. चरता-चरता तिन्ही म्हैशी तारेला चिटकल्या. यावेळी त्यांना वाचवण्यसाठी पत्नी व मुलगा करत असल्याचे शेतकऱ्याने पाहिल्यावर जोरदार ओरडल्याने ते तात्काळ थांबले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळं शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पशूधन विकास अधिकारी डॉ रामचंद्र पाटील, उपअभियंता अनुप ओव्हाळ, गावकामगार तलाठी अरविंद कादे, पोलिस उपनिरिक्षक शिवाजी हाळे, पोलिस हवालदार प्रदिप चव्हाण, क्षीरसागर पोलिस पाटील, उपसरपंच अशिष क्षीरसागर, डॉ. रणजित क्षीरसागर आदांनी घटना स्थळावर भेट घेऊन घटनेचा सविस्तर पंचनामा केला.
माझा पूर्वजात दुग्ध व्यवसाय असून माझे कुटूंब दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. आजच्या घटनेनं माझे सुमारे अडीच लाख रुपयाचे नुकसान झाल्याने माझा संसार उघडयावर पडला आहे. त्यामुळे शासनाने योग्य ती दखल घेऊन त्वरीत मला आर्थिक मदत मिळावी.- जयकुमार कोरे, पशुपालक शेतकरी
नागझरी नदीपात्राच्या कडेला शेतातील विद्युत खांबावरील तार तुटल्याने हा अपघात घडला आहे. तरी या घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल.- अनुपम ओव्हाळ, महावितरण कनिष्ट अभियंता, सुर्डी