पंढरपूर: पुढारी वृत्तसेवा : कार्तिकी वारीला महाराष्ट्रसह इतर राज्यातील वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात मोठ्या संख्येने येतात. या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठरायाचे दर्शन सुलभ व तत्काळ होण्यासाठी शुक्रवार (दि. 28) पासून 'श्रीविठ्ठल रुक्मिणी चे दर्शन 24 तास सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
कार्तिक शुद्ध एकादशीचा मुख्य सोहळा दि. 4 नोव्हेबर रोजी साजरा होत आहे. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी दि. 28 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत 24 तास दर्शन सुरु ठेवण्यात येणार आहे.
सकाळी देवाच्या शेजघरातील चांदीचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला. श्री विठ्ठलास मऊ कापसाचा लोड तर रुक्मिणीमातेस तक्या लावण्यात आला आहे. आजपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत (दि.13 नोव्हेंबर) बंद राहतील. या कालावधीत श्रीविठ्ठल रुक्मिणीची नित्यपूजा, महानैवद्य, गंधाक्षता हे नित्योपचार सुरु राहतील. नित्योपचाराची वेळा वगळता श्रींचे पददर्शन 22.15 तास सुरु राहील. तर मुखदर्शन 24 तास सुरु राहील.
यावेळी मंदिर समितीचे सदस्या शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), माधवी निगडे, लेखा अधिकारी अनिल पाटील, विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरु केल्याने आता दररोज सुमारे 35 ते 40 हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन तर सुमारे 40 ते 45 हजार भाविकांना मुखदर्शन मिळणार आहे. 24 तास दर्शन सुरु केल्याने भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळणार आहे.
– बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, मंदिर समिती
हेही वाचलंत का ?