टेंभुर्णी : उजनी धरणातून सोमवारी (दि.5) कालवा,भीमा-सीना बोगदा,सीना-माढा उपसा-सिंचन योजना यामधून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अद्याप ही पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी टंचाई सदृश स्थिती आहे.मात्र उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून उजनी धरणाची वाटचाल सध्या ९० टक्केच्या दिशेने सुरू आहे.या पार्श्वभूमीवर उजनी धरणाच्या पाणी साठ्याचा अंदाज घेऊन उजनी कालवा,भीमा-सीना जोड कालवा व सिंचन योजनातून तातडीने पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार बबनराव शिंदे यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाकडे पत्राद्वारे केलेली होती.
या अनुषंगाने शनिवार दि.०३ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील आमदार बबनराव शिंदे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी आ.बबनराव शिंदे यांच्या या मागणीस मान्यता दिलेली असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.यावेळी जलसंपदाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे उपस्थित होते.
त्यानुसार सोमवार दि.०५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून पासून उजनीचा मुख्य कालवा,भीमा-सीना जोड कालवा तसेच सीना-माढा उपसा- सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली आहे.या पाण्यातून करकंबचा पाणी टॅंक,आष्टी तलाव सर्व लहान,मोठे बंधारे ओढे,नाले आदी सर्व स्त्रोत भरून घेण्यात येणार आहेत.नागरिकांची पिण्याची व त्यानंतर शेतीची पाणीटंचाई कमी होईल असेही आ.बबनराव शिंदे विश्वास व्यक्त केला आहे.