उरमोडी धरण काठोकाठ भरले असून गुरुवारी चौथ्यांदा धरणातून पाणी सोडण्यात आले.  Pudhari Photo
सातारा

उरमोडी धरण भरले; चौथ्यांदा विसर्ग

आतापर्यंत यंदा विक्रमी 2.60 टीएमसी पाणी वाहून गेले

करण शिंदे

परळी : पुढारी वृत्तसेवा

यंदा दमदार सुरू असलेल्या पावसामुळे सातार्‍याच्या पश्चिमेला असलेले उरमोडी धरण अगदी काठोकाठ म्हणजे 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून गुरुवारी चौथ्यांदा विसर्ग करण्यात आला. यंदा आतापर्यंत तब्बल 2.60 टीएमसी पाणी नदीपात्रात सोडून देण्यात आले असून हा उच्चांक ठरला आहे.

पश्चिमेकडे परळी खोर्‍यात यंदा जोरदार पाऊस कोसळला असून अद्याप पावसाची बरसात कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी निर्धारित ठेवण्याकरिता गुरुवारी चौथ्यांदा धरणातून पाणी सोडण्यात आले. सुमारे 750 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यावर्षी आतापर्यंत धरणातून एकूण चार वेळा विसर्ग करण्यात आला असून आजचा गुरुवारचा विसर्ग चौथ्या वेळचा आहे. सांडव्यातून 300 क्यूसेक, तर विद्युत गृहातून 450 क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे.

अजूनही पाऊस सुरू असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याची आवक बघून विसर्गात वाढ किंवा घट करण्यात येईल. उरमोडी प्रकल्पात सद्यस्थितीत 9.96 टीएमसी इतका पाणीसाठा असून सांडवा माथा पातळी 688.00 मी. इतकी आहे. प्रकल्पाच्या दोन्ही पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण सुरूच आहे. यावर्षीच्या दमदार पावसामुळे उरमोडी प्रकल्पातून उच्चांकी विसर्ग झाला आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता अमित तपासे, सहायक अभियंता गणेश कणसे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT