कराड, पुढारी वृत्तसेवा : मागील पाच दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी असल्याने चिंता व्यक्त केल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्याने रविवारी (दि. २३) रात्री ११ वाजता अर्धशतक गाठले. महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयात सोमवारपर्यंत सुमारे २५ टीएमसी इतकाच पाणी साठा होता. त्याचवेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. कोयना, नवजात, महाबळेश्वर यासह पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने पाठ फिरविल्याने धरणातील पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत होती. मात्र, मंगळवारी पावसाचा जोर वाढला होता आणि बुधवारी मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती.
पावसाचा जोर पुन्हा मंदावला होता. त्यामुळे पुन्हा पाऊस पाठ फिरवणार नाही ना ? असा संभ्रम असतानाच शनिवारी पावसाचा जोर पुन्हा वाढला आणि शनिवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठा 44 टीएमसीहून अधिक झाला होता. शनिवारी रात्री व रविवारी पावसाचा जोर कायम असल्याने त्यानंतरच्या 16 तासात धरणात 6 टीएमसी पाण्याची आवक होऊन रविवारी रात्री धरणाच्या शिवसागर जलाशयात 50.04 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही 55 टीएमसी पाण्याची गरज आहे. रविवारी रात्री धरण एकूण क्षमतेच्या 47.54 टक्के भरले होते. तर धरणातील उपयुक्त पाणीसाठा 45 टीएमसी इतका होता.