सातारा

सातारा : कण्हेर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

अनुराधा कोरवी

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : रायगाव ( ता. जावली ) येथील छाबडा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा कण्हेर धरणात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १च्या सुमारास घडली असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. स्वराज संभाजीराव माने-देशमुख (वय-२३, रा. अकलूज (सध्या रा. सातारा येथील मंगळवार पेठे) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

अक्षय तृतीया व रमजान ईदनिमित्त सर्व कॉलेज व शाळांना सुट्टी असल्याने छाबडा कॉलेजचे सुमारे १० विद्यार्थी मिळून शनिवारी (दि.२२) रोजी धरणावर पोहण्यास गेले होते. दरम्यान स्वराज हा लांबवर धरणातील पाण्यात पोहत गेला असता त्याला दम लागून तो पाण्यात बुडाला. स्वराज बुडाल्याचे समजल्यावर त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. परंतु, धरणात लांब पाण्यामध्ये स्वराज बुडाल्याने वाचवता आले नाही.

स्वराज हा छाबडा येथील कॉलेजमध्ये बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत असून तो सातारा येथे राहत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ आहे. या घटनेची माहिती मिळताच धरण परिसरातील नागरिकांनी धरणावर गर्दी केली आहे.

याबाबतची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. खोल पाण्यामध्ये बुडालेल्या स्वराजला पाण्याबाहेर काढण्यासाठी छ. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT