सांगली

सांगली : राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे खच्चीकरण, त्यामुळेच मी ‘शिंदेंच्या गटात; आनंदराव पवार

मोनिका क्षीरसागर

इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा:  राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सहा महिन्यातच जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिवसेनेचे खच्चीकरण करायला सुरुवात केली. त्यांनी पोलिसांमार्फत शिवसैनिकांवर गंभीर कारवाया केल्या. आमचे बंड हे पक्षाविरुद्ध नसून, राष्ट्रवादीच्या विरोधात आहे. आम्ही (स्व) बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत. त्यामुळे शिवसेना कोणीही सोडणार नाही, असे सांगून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे जाहीर केले. येथील शिवसेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत पवार बोलत होते.

पवार म्हणाले, शिवसैनिकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांना दिली होती. मात्र त्यांच्याकडून कसलीही कार्यवाही झाली नाही, तसेच त्यांनी याकडे लक्षही दिले नाही. त्यातच पालकमंत्री जयंत पाटील हे नेहमीच शिवसेनेची गळचेपी करत आले आहेत. मंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा, तालुका पातळीवरील सर्व प्रशासकीय विभागात शिवसैनिकांच्या कामाची अडवणूक करण्याचे आदेशच अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे हे बंड राष्ट्रवादीविरुद्धच आहे.

ते म्हणाले, राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे मोठे नुकसान केले आहे. आमचे राष्ट्रवादीच्या मनमानिविरुद्ध हे बंड आहे. आगामी पालिका निवडणूक ही विकास आघाडीसोबत शिवसेना म्हणूनच लढणार आहोत. पुढे ते म्हणाले, पालकमंत्र्यांची जिल्हा समितीमध्ये शिवसैनिकांना डावलण्यात भूमिका आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपूर शहराच्या विकासाला दिलेला ११ कोटींचा निधी पालकमंत्री पाटील यांनी अडवून धरला. मात्र पाठपुराव्याने शिंदे यांनी तब्बल २१ कोटींचा निधी दिला. या निधीतूनच शहरातील रस्ते, गटारी व इतर विकासकामे सुरू आहेत. यावेळी दि.बा.पाटील, शकील सय्यद, सागर मलगुंडे, वीर कुदळे, राजेंद्र पवार, उमेश पवार, डॉ.सचिन पाटील, अंकुश माने, सतीश पाटील, प्रताप खराडे, सचिन कुचीवाले, योगेश हुबाले उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT