Kavathe Mahankal Grape Farmer Death
कवठेमहांकाळ : द्राक्षबागेच्या नापिकीमुळे बँकेचे २० ते २५ लाख रुपयांचे कर्ज फेडायचे तरी कसे ? या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि.१७) सकाळी घडली. प्रतापराव श्रीपतराव शिंदे (वय ५४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
या घटनेमुळे मळणगाव परिसरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांना धीर देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्यांच्या घरी भेट देत आहेत. द्राक्षबागायतदार शेतकऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतापराव शिंदे मेहनती आणि प्रगतशील द्राक्षबागायतदार म्हणून ओळखले जात होते. तीन एकर क्षेत्रात त्यांनी द्राक्षबाग उभारली होती. आधुनिक पद्धतीचा अवलंब करून द्राक्ष उत्पादनात चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांपासून बदलत्या हवामानाचा फटका, वाढलेले उत्पादन खर्च, औषधे व खतांच्या वाढत्या किंमती आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अशी माहिती कुटुंबियांनी दिली.
द्राक्षबाग उभारण्यासाठी त्यांनी सुरुवातीला मळणगाव येथील विकास सोसायटीकडून मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले होते. शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्ज थकीत गेले. वाढत्या व्याजामुळे आर्थिक ताण अधिकच वाढत गेला. परिस्थिती सावरण्याच्या उद्देशाने नंतर फेडरल बँकेचे कर्ज घेऊन सोसायटीचे कर्ज फेडले. मात्र, नव्या कर्जाच्या हप्त्यांचा बोजा त्यांच्या खांद्यावर आणखी वाढत चालला होता.
हवामानातील अनियमितता आणि रोगराईमुळे या वर्षी तीन एकर बागेला द्राक्षे लागलीच नाहीत. त्यामुळे संपूर्ण वर्षभराचा खर्च वाया गेला. शेवटी निराश होऊन त्यांनी तीनही एकर द्राक्षबाग तोडून टाकली. ही घटना त्यांच्या मानसिक स्थितीवर मोठा आघात करणारी ठरली होती. मार्च एंडिंग जवळ येताना बँकांच्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी त्यांनी शेतात जाऊन गळफास घेऊन जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
सकाळी शेतात गेलेल्या ग्रामस्थांना ही बाब लक्षात आली आणि गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठवण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केलेनंतर शोकाकूल वातावरणात मळणगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रतापराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा इचलकरंजी येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कुटुंबाच्या शिक्षणाच्या आणि भविष्यासाठी त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली होती. मात्र, या दुर्घटनेमुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रतापराव शिंदे मेहनती शेतकरी असूनही केवळ निसर्गाच्या लहरीपणामुळे आलेल्या आर्थिक अडचणींमुळे त्यांना जीव द्यावा लागला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करुन कुटूंबियांना दिलासा द्यावा. द्राक्षशेती व द्राक्षबागायतदार वाचविण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.- सुरेखा जाधव, लोकनियुक्त सरपंच मळणगाव (ता. कवठेमहांकाळ)