ईश्वरपूर : येथील भाजपचे नेते विक्रम पाटील यांचे बंधू, उरूण सेवा सोसायटीचे अध्यक्ष महेश पाटील आणि नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते भाजपचे विजय कुंभार यांनी आ. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दोघांच्या प्रवेशाने नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील आघाडीला धक्का बसला आहे. महेश पाटील यांच्या पत्नी सुप्रिया पाटील या माजी नगरसेविका आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यालयात दोघांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
आ. जयंत पाटील म्हणाले, विरोधी गटातील काहीजणांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे आणखी काहीजण आपल्याकडे आले, तर आश्चर्य वाटायला नको. महेश पाटील हे जिद्दी कार्यकर्ते, तर विजय कुंभार हे अभ्यासू नगरसेवक आहेत. महेश पाटील यांनी प्रभाग क्रमांक एक हा जिवापाड जपला आहे. माझा कोणावर राग नाही, कोणाचा द्वेष नाही. या शहरातील रखडलेली कामे मार्गी लावून शहराचा विकास अधिक गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दोन्ही कार्यकर्त्यांना आमच्या पक्षात मानाची, सन्मानाची वागणूक दिली जाईल. या दोघांच्या प्रवेशाने आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांना दुप्पट बळ मिळेल. यावेळी त्यांनी अशोकदादा पाटील यांच्याशी असणाऱ्या ऋणानुबंधाचा आवर्जून उल्लेख केला.
महेश पाटील म्हणाले, माझे वडील अशोकदादा पाटील व माझ्या कुटुंबाने 45 वर्षे भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. तो पक्ष सोडताना कंठ दाटून येतो. माझ्या वडिलांनी कायम या शहरातील गुंडगिरी आणि अवैध धंद्याविरोधी लढा दिला आहे. सध्या तीन गुन्हेगारी टोळ्या एकत्र येऊन नगरपालिकेच्या निवडणुकीची उमेदवारी ठरवीत आहेत. हे या शहराच्या भवितव्यासाठी मारक आहे. आम्ही ते खपवून घेणार नाही. विकास आघाडीच्या उमेदवारांची चर्चा होताना माझा सख्खा भाऊ आणि चुलत भाऊ तिथे उपस्थित होते. ज्यांना आपण 25 वर्षे सांभाळले, ते भाजपात गेले आहेत.
विजय कुंभार म्हणाले, विकास आघाडीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचा उद्योग सुरू आहे. सक्षम आणि एकमुखी नेतृत्वाशिवाय या शहराच्या विकासाला गती मिळणार नाही. आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही, म्हणून आम्ही आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक बी. ए. पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, प्रा. शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, खंडेराव जाधव, सुरेंद्र पाटील, दादासाहेब पाटील, अरुणादेवी पाटील, पुष्पलता खरात, मुनीर पटवेकर, सुभाषराव सूर्यवंशी, डॉ. संग्राम पाटील, शंकरराव चव्हाण, पीरअली पुणेकर, रोझा किणीकर, शंकरराव पाटील, रवींद्र वाघमोडे, गुलाब शिरटेकर, संजय पाटील, शैलेश पाटील, अशोक उरूणकर, अनिल पावणे, विक्रम घाटगे, मोहन भिंगार्डे उपस्थित होते.