

इस्लामपूर : राजारामबापू दूध संघ तोट्यातून आता नफ्यात आला आहे. संघाच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाकडे एकदम क्लीन दूध संघ आला आहे. त्यामुळे आता दूध संघाची प्रगती कायम ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. भविष्यात दूध व्यवसायाला चांगले दिवस येतील, असे सध्याचे तरी वातावरण आहे. त्यामुळे आपल्या संघाने दूध संकलन वाढवून पुन्हा दूध पावडर निर्मिती प्रकल्प चालू करावा, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले.
येथील राजारामबापू पाटील दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील. अध्यक्ष विजय यादव, उपाध्यक्ष माणिक पाटील, दूध संघाचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, तज्ज्ञ संचालक व्ही. श्रीनिवास, बी. के. पाटील, रवींद्र बर्डे, शहाजी पाटील, सभापती डॉ. अशोक पाटील उपस्थित होते.
आ. जयंत पाटील म्हणाले, दूध संघाचे दिवंगत अध्यक्ष नेताजी पाटील यांनी दूध संघासाठी खूप वेळ दिला. प्रामाणिक कारभार करत दूध संघ तोट्यातून नफ्यात आणला. प्रतीक पाटील म्हणाले, दूध संघाच्या प्रगतीत दूध उत्पादक शेतकर्यांबरोबरच कर्मचार्यांचाही मोठा वाटा आहे. दूध संकलन वाढत आहे. संघाने कार्यक्षेत्रातीलच दूध संकलन करण्यावर भर द्यावा.
अध्यक्ष संग्राम फडतरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यालयीन अधीक्षक लालसाहेब साळुंखे यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक एस. पी. ढोपे यांनी नोटीस वाचन केले. असिस्टंट जनरल मॅनेजर बी. ए. कोरे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, डॉ. प्रकाश पाटील, अतुल पाटील, संभाजी कचरे, बंडोपंत नांगरे, दिलीप खांबे, धैर्यशील पाटील, संजय शिंदे, सुभाष सूर्यवंशी, विकास कांबळे आदी उपस्थित होते.
सभासदांना अनेक सवलती...
दूध संघाचे दिवंगत अध्यक्ष नेताजी पाटील यांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात झाली. संघाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांसाठी म्हैस खरेदी , रेडी संगोपन, कडबा कुट्टी मशीन, जनावरांचा विमा आदिला अनुदान देण्याची तसेच दूध संस्थांचे कमिशन वाढवण्याची घोषणा करण्यात आली. प्रकाश गायकवाड यांना गुणवंत कामगार म्हणून सन्मानित करण्यात आले.