सांगली : शशिकांत शिंदे
सांगली पाटबंधारे विभागाचे वारणाली येथील म्हैसाळ व टेंभू योजनांचे मध्यवर्ती कार्यालय तडकफडकी विटा, कवठेमहांकाळ आणि जत येथे हलवल्यानंतर आता तेथील कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीवरही कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात झाली आहे. वारणाली येथील पाटबंधारे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना तातडीने क्व्हॉर्टर्स खाली करण्याच्या नोटिस बजावल्या आहेत.
विशेष म्हणजे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार ही कार्यवाही केली जात असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कार्यालयाचे स्थलांतर आणि आता निवासी वसाहत रिकामी करण्याचा धडाका पाहता, वारणालीतील शेकडो कोटी रुपयांची ३५ एकर मोकळी शासकीय जागा नेमकी कोणाच्या घशात घालण्याचा डाव आखला जात आहे? असा प्रश्न अनेकजण खाजगीत उपस्थित करीत आहेत.
वारणाली येथील विश्रामबाग ते सांगली-मिरज जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील हा ३५ एकरचा परिसर गेल्या ६ ते ७ दशकांपासून पाटबंधारे विभागाच्या ताब्यात आहे. या विस्तीर्ण आवारात प्रशासकीय इमारतीसह अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्वॉर्टर्स उभारले आहेत. ही जागा आणि येथील इमारतींवर आजवर शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, पूर्व भागातील सिंचन योजनांच्या नियंत्रणणाचे कारण पुढे करून टेंभू आणि म्हैसाळ योजनांची मुख्य कार्यालये घाईगडबडीत सांगलीतून बाहेर हलवली. या तडकफडकी निर्णयामुळे स्थानिक पातळीवर आधीच तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्यातच आता तेथील निवासी वसाहतीमधील १४ कर्मचाऱ्यांना निवासस्थाने रिकामी करण्याचे आदेश दिल्याने या संतापाचा उद्रेक झाला आहे.
कार्यालये आणि वसाहत रिकामी करून ही ३५ एकर अत्यंत मोकळी जागा बांधकाम व्यवसायिकाच्या (बिल्डर लॉबी) घशात घालण्याचा किंवा 'बीओटी' तत्त्वावर खाजगी विकासकांना देण्याचा सरकारचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप होऊ लागला आहे. या निर्णयामुळे प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. जलसंपदा विभागाच्या या संशयास्पद कारभाराविरोधात आणि मोकळी जागा खाजगीकरणाच्या मार्गावर नेण्याच्या धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांतून असंतोष आहे.
वारणाली परिसरातील रस्ते, विश्रामगृह, कार्यालय परिसराच्या सुशोभीकरणावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. ही जागा विकसित करण्यासाठी इतरांना दिल्यास हे पैसे वाया जाणार आहेत.
वारणाली परिसरातील टेंभू आणि म्हैसाळ योजनांचे कार्यालय स्थलांतरित केले आहे. या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवासस्थाने (क्व्हॉर्टर्स) सोडण्यासंबंधित नोटिस बजावलेल्या आहेत.महादेव कदम, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग.