तासगाव; पुढारी वृत्तसेवा : योगेवाडी – मणेराजुरी मिनी एमआयडीसी मध्ये प्रदूषण विरहीत 'ग्रीन इंडस्ट्री' उभी करणार असल्याची माहिती एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसूंधरा जाधव यांनी तासगाव येथील तहसिल कार्यालयात आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत बुधवारी (दि.१) दिली. एमआयडीसीमध्ये प्रदूषण निर्माण करणाऱ्या कोणत्याच उद्योगाला परवाना देणार नसल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. गजानन खडकीकर यांनी दिली.
दरम्यान शासकीय जागेवर एमआयडीसी उभी करायला आमचा कोणताही विरोध नाही. परंतू खाजगी जागेवर एमआयडीसी उभी करुन देणार नाही, असा आक्रमक पवित्रा या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला. आमच्या खासगी जमिनीच्या सातबारावर असलेले 'एमआयडीसी'चे शिक्के काढून टाका अशी मागणी बैठकीत केली.
तहसिलदार कार्यालयात तहसिलदार रवींद्र रांजणे, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी वसूंधरा जाधव, कार्यकारी अभियंता सुधाकर गांधीले, प्रमुख भूमापक पवन बोबडे, सहायक क्षेत्रव्यवस्थापक जयवंत वावरे, एमआयडीसीचे सहायक अभियंता प्रभाकर गवळी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे डॉ. गजानन खडकीकर, मणेराजुरी मंडल अधिकारी राजश्री सानप, गावकामगार तलाठी शिवाजी चव्हाण, योगेवाडीच्या सरपंच दिपाली माने, राजेश माने, मणेराजुरीचे शेतकरी शशिकांत जमदाडे, शैलेश शिंदे यांच्यासह प्रमुख शेतक-यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसूंधरा जाधव म्हणाल्या, सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये एमआयडीसी आहे. तेथील तरुणांना तालुक्यात रोजगार उपलब्ध होतो. पण, तासगाव हा एकमेव तालुका आहे ज्या ठिकाणी एमआयडीसी नाही. या तालुक्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी एमआयडीसी उभी राहण्यासाठी सकारात्मक विचार करावा.
बैठकीला उपस्थित शेतकऱ्यांनी शासकीय जमिनीवर एमआयडीसीला हरकत नाही असे सांगून जर खाजगी जागेवरही उद्योग उभारणी करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही टोकाचा विरोध करु असा इशारा दिला. तर तहसिलदार रवींद्र रांजणे यांनी खाजगी जागेवर कोणत्याही शेतकऱ्यांच्या इच्छेविरोधात उद्योगांची उभारणी केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली. एवढ्या आश्वासनावर समाधान न झालेल्या शेतकऱ्यांनी खाजगी जागेवरील एमआयडीसीचे शिक्के उठवा अशी मागणी केली. यानंतर तसे अर्ज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशासनाकडे सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी केले.
धुराड्यांच्या कंपनीला परवाना नाही
बैठकीस उपस्थित शेतकऱ्यांनी एमआयडीसी सुरू झाल्यानंतर होणाऱ्या प्रदूषणामुळे त्याचा द्राक्षबागांवर गंभीर परिणाम होईल अशी शंका उपस्थित केली. यावर बोलताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे डॉ. गजानन खडकीकर म्हणाले, भागातील द्राक्ष बागांच्या लागवडीखाल क्षेत्राचा विचार करुन एमआयडीसीत उद्योगांना परवानगी देत असताना ज्या उद्योगामुळे प्रदूषण होईल तसेच सांडपाणी निर्माण होईल अशा कोणत्याही उद्योगास या ठिकाणी परवाना दिला जाणार नाही. एवढेच नव्हे तर ज्या कंपनीला धुराडे असेल त्या कंपनीला या ठिकाणी परवाना न देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याची काळजी करु नये अशी ग्वाही त्यांनी दिली.
हेही वाचा;