तासगाव : येरळा नदीला आलेल्या पुरामुळे तासगाव ते जुना सातारा रस्त्यावरील (तांदळे वस्ती) येथे पुलावरून वृद्ध दाम्पत्य मोटारसायकलसह वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफच्या दोन टीमकडून शोधकार्य सुरू होते. हे दाम्पत्य कोण होते, याची उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही.
चार दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे येरळा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्याने नदीपुलावरील वाहतूक चार दिवसांपासून बंद होती. मात्र पुलावरील पाणी कमी होताच काही वाहने ये-जा करीत होती. रविवारी आणि सोमवारी सकाळी झालेल्या पावसाने नदीवरील पुलाच्या पाणी पातळीत वाढ झाली. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नदीकाठावर नदी पार करून जाण्यासाठी काहीजण मोटरसायकलसह थांबून होते, पण कोणाचे धाडस होत नव्हते. याचवेळी एक वृद्ध दाम्पत्य मोटरसायकलवरून या ठिकाणी आले. त्यावेळी काही जणांनी या दाम्पत्याला, नदीला पाणी जास्त आहे, तुम्ही नदी पार करू नका, असे सांगितले. पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून या दाम्पत्याने नदीपुलावरून मोटरसायकलवरून जाऊ लागले.
पुलाच्या मध्यावर येताच चालकाच्या हातून मोटरसायकल निसटली आणि हे दाम्पत्य तोल जाऊन पाण्यात पडले. काही क्षणात ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने काठावर असणार्यांना या दाम्पत्याला वाचविण्यासाठी मदत करता आली नाही. दोन-तीन मिनिटात दाम्पत्य पाण्यात बुडून दिसेनासे झाले.
नदीकाठच्या रहिवाशांनी पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि तहसीलदार अतुल पाटोळे यांना माहिती दिली. एनडीआरएफ च्या टीमला बोलावले. वीस जवानांच्या दोन टीमने सायंकाळी पाच वाजल्यापासून नदीपात्रात दोन किलोमीटर परिसरात दोन तास शोधमोहीम राबवली. पण रात्र झाल्याने सायंकाळी सात वाजता शोधमोहीम थांबवावी लागली. गळ टाकून मोटरसायकलचाही शोध घेतला. पण ती सापडली नाही.
तासगाव - जुना सातारा रस्त्यावरून या काळात कोणकोणती वाहने गेली, याचा तपास सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस करत आहेत. वाहून गेलेले दांपत्य कोण आहे, याचा शोध मोटरसायकलच्या क्रमांकावरून घेता येईल यासाठी प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सांगितली.