कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : इस्लाम हा शांतीप्रिय धर्म आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला शांततेचा सत्य, अहिंसा व माणुसकीचा दिलेला संदेश प्रेरणादायी असुन त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
कडेगांव येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यावतीने मुस्लिम बांधवाकरीता शाही इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, कडेगाव जामा मशीदचे पेश इमाम हाफिज मंजूर अली, मदिना मशिदचे पेश इमाम प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना डॉ. विश्वजित कदम म्हणाले, कडेगाव हे ऐतिहासिक गाव असून हे गाव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून संपूर्ण महारष्ट्रात ओळखले जाते. येथे प्रत्येक हिंदू बांधवांच्या सणात मुस्लिम बांधवांचा मान असतो, तर मुस्लीम बांधवांच्या प्रत्येक सणात हिंदू बांधवांचा मान असतो. अशा या शहराचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घेणे गरजेचे आहे. पुढे ते म्हणाले, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे गरजेचे आहे. सर्व धर्मामध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसातील बंधुभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कार्यक्रम होणे सुध्दा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुभाव वाढिस लागण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष साजिद पाटील यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते सुरेश थोरात, दिपक भोसले, विरोधी पक्षनेते विजय शिंदे, महेश कदम, नगरसेवक मनोजकुमार मिसळ, सिद्दीक पठाण, सागर सकटे, अशपाक पठाण, सागर सुर्यवंशी, शशिकांत रासकर, महेश जाधव, दादासो माळी, यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लीम बांधव उपस्थित होते.
येथील कडेगाव मुस्लिम समाजासाठी भरगच्च विकास कामे करण्यात येतील. विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. समाजाच्या विकासासाठी कदम कुटुंब कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार कदम यांनी दिली.
हेही वाचा :